Blog
स्पर्धक क्रमांक ३४ शरद संत पुणे
राजा शिवछत्रपती
भारतीयांनी श्रीशिवछत्रपतींची रणनीती, युद्धकला, चातुर्य,
धीरोदात्तता, साहस, पराक्रम, अर्थनीती, राजकारण, औदार्य, सहिष्णुता, धर्मनिष्ठा, देशप्रेम इ. गुणांचा जितका सखोल अभ्यास केला नसेल, त्यापेक्षा जास्त अभ्यास परकीयांनी केला आहे. परदेशांच्या अभ्यासक्रमांत 'छत्रपतींची व्यूहरचना' हा विषय अभ्यासून त्याची समीक्षा केली जाते. ऍडोल्फ हिटलरसारखा क्रूरकर्मासुद्धा 'आमच्या देशात शिवाजीसारखा शूरवीर जन्मला असता तर आम्ही जगज्जेते झालो असतो' असे गौरवोद्गार काढतो, त्यातच महाराजांचे असामान्य व्यक्तिमत्त्व सिद्ध होते. महाराजांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रातील अनेक इतिहासकारांनी संपूर्ण आयुष्य शिवचरित्रासाठी वेचून त्यांचे वास्तव दर्शवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची अंधभक्त म्हणून अवहेलना करण्यात आली. उलटपक्षी त्यांच्या जीवनातील कुटुंबकलह, प्रधानांची फंदफितुरी, अन्नातून झालेला विषप्रयोग, मृत्युसमयी प्राणप्रिय पुत्राचा वियोग अशा वैयक्तिक समस्यांवर अकारण रकाने भरून हिंदूंच्या भावना दुखावण्याचे पातक करण्यात आले. जातीय तेढ माजवण्याचा उद्देश नजरेआड करून फक्त त्यांचा पत्रव्यवहार आणि बखरी जरी अभ्यासपूर्वक वाचल्या तरी ते महाराजांच्या पराक्रमी जीवनाचे आदर्शत्वदर्शक झाले असते.
१९६२-६३ साली आम्ही आठवीत असताना आमच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात एक धडा होता. त्यातील गडांचा राजा असलेल्या रायगडाचे वर्णन आजही स्मरणात आहे. *
*'Shivaji's capital at Raigad was not a rich city down in plains, but it situated in the high mountains of Sahyadri'** हे स्फूर्तिदायक वाक्य राजांचा राज्याचा सुरक्षितताविषयक दृष्टिकोन स्पष्ट करते. शत्रूंचे किल्ले जिंकणे, त्यांची सुरक्षा पाहण्यासाठी आवश्यक डागडुजी व सुधारणा करणे, सभोवतालच्या परिसरातील रयतेला सुखसमाधानी व संरक्षित जीवन उपभोगण्यासाठी सोयीसवलती निर्माण करणे, ते करतील तो व्यवसाय देश व धर्म यांच्या संगोपनासाठी आहे ही भावना प्रस्थापित करणे, त्यासाठी देशभक्त व नीतिमान सुभेदार नियुक्त करणे, सैन्याची पुत्रवत काळजी घेणे ही सारी आदर्श राजाची लक्षणे त्यांनी स्वराज्यास जे तीनशेच्यावर किल्ले जोडले, त्यांतून दिसून येतात.या कामात त्यांना धर्मसत्तेचे महत्वपूर्ण योगदान लाभले. समर्थ रामदासांनी डोळसपणे स्थापन केलेल्या मठांच्या परिसरांतील किल्ले महाराजांनी पुढील वर्षभरात जिंकून घेतले. तुकाराम महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून हजारो प्रतिशिवाजी तयार केले. याची असंख्य उदाहरणे *"धर्म राजकारण समवेत चालती, शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधती"* या काव्यपंक्तीची सत्यता पटवून देतात. जरीपटका व भगवा झेंडा एकाच वेळी ऐश्वर्य आणि त्याग दाखवत असून ते राजाचे नसून राज्याचे वैभव दाखवतात. राजा हा उपभोगशून्य स्वामी असून राज्य ही श्रींची मालमत्ता आहे, ही शिकवण त्यांना धर्मसत्तेने दिली. स्वतःच्या कृती व जिव्हाळ्यातून हीच शिकवण त्यांनी खंडो बल्लाळ, हिरोजी फर्जंद, तानाजी, सूर्याजी, मुरारबाजी, बाजीप्रभू यांच्यासारख्या, देशासाठी प्राणार्पण करण्यास सज्ज असलेल्या जिवलगांना, तसेच सामान्य रयतेला दिली. त्यामुळेच अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात ते स्वराज्य साकारू शकले. एकाच वेळी सात मोगल सत्ता, टोपीकर इंग्रज, फ्रेंच व पोर्तुगीज वसाहतींना जेरीस आणून भयमुक्त समाज घडवणे व धर्माधिष्ठित शासनव्यवस्था प्रस्थापित करणे, हा राजांचा अद्वितीय पराक्रम वाटतो. आक्रमकांना थोपवणे, महाराष्ट्रातील डोंगर,दऱ्या, ओबडधोबड खाचखळगे,निबिड घनदाट अरण्ये-जंगले, निसर्गाचा लहरीपणा या नैसर्गिक परिस्थितीचा खुबीने वापर करून त्यांनी बलाढ्य शत्रू नामोहरम केले, त्यांच्याकडून मिळवलेल्या लुटीचा भरणा राज्याच्या कोषात कटाक्षाने करून तिचा उपयोग रयतेच्या विकासासाठी केला, हे निःस्वार्थी व निर्मोही राजाचे वैशिष्ट्य दाखवतात. धीरोदात्त व संयमी वृत्तीने मिर्झाराजे जयसिंग याच्याबरोबर केलेला पुरंदरचा तह, २७ किल्ले देणे भाग पडूनही ते परत मिळवण्यासाठी शंभूराजांना सोबत घेऊन दिल्लीत शत्रूच्या छावणीत दाखल होण्याचा धोका पत्करणे, पंचहजारी सरदार म्हणून औरंगजेबाने केलेली अवहेलना सोसून सुटकेसाठी प्रयत्नशील राहणे, युवराज सुरक्षित राखण्यासाठी त्यांच्या मृत्यूची आवई उठवणे, स्वामिनिष्ठ सुहृदांकडे त्यांना मथुरेत ठेवून सहीसलामत स्वराज्यात दाखल होणे, सिद्दीच्या वेढ्यातून प्रसंगावधान राखत मुक्तता... ही धीरोदात्त राजाची वैशिष्ट्ये दिसतात.
छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप या असामान्य राजांना जर स्वकीयांनी साथ दिली असती तर देश पारतंत्र्यात खितपत पडला नसता, असेच त्यांच्या इतिहासावरून वाटते.
----------------------------
शरद संत,
सॉंगबर्ड्स
टॉवर नं ९/७०७
भुगाव,तालुका मुळशी,जि. पुणे
413115
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा