स्पर्धक क्रमांक ५ अक्षय नामदेव माने सोलापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ५ अक्षय नामदेव माने सोलापूर

राजा शिवछत्रपती

यशवंत, कीर्तिवंत !
सामर्थ्यवंत, वरदवंत !!
पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा !!

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवंत राजा होता.

निश्चयाचा महामेरू !
बहुत जनांसी आधारू !
अखंड स्थितीचा निर्धारू !
श्रीमंत योगी !!

अशा साक्षपूर्ण शब्दांत या जाणत्या राजाचे वर्णन समर्थांनी केले आहे. शिवाजी महाराज श्रीमंत तर होतेच; पण योगीही होते. दक्षता, कणखरता आणि तत्परता असा स्थायीभाव असलेल्या शिवछत्रपतींच्या शब्दकोशात आळस नव्हता, उत्साह होता, चंचलता नव्हती, निग्रह होता, मोह नव्हता, ममता होती, भोगवाद नव्हता, त्यागवाद होता.

महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण-घडण केली. सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.

आज, महाराजांचे नाव वापरुन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. सत्ता व मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराज फक्त आमचेच आहेत, अशी जणू स्पर्धाच लागलेली असते. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, छत्रपतींच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे, पण त्यांच्या विचारांना कृतीत आणणाऱ्या लोकांचा मात्र दुष्काळ आहे. आपण शिवचरित्र, महाराजांच्या गुणांना किती आत्मसात केले आहे? महाराज संपूर्णत: निर्व्यसनी होते. आज आपले पुढारी, राज्यकर्ते निर्व्यसनी आहेत का? त्यांनी आखून दिलेली जीवनपद्धती, राबवलेली राज्यपद्धती, यांचा मात्र सपशेल विसर पडलेला आहे. ज्या शिवरायांनी महाराष्ट्रासाठी जीवनऊर्जा समर्पित केली, त्यांचे जीवनचरित्र चौकटीत बंदिस्त करण्यापेक्षा त्यांच्या चरित्रावर प्राणप्रतिष्ठा करायला हवी. त्यांचे आचार-विचार आंगिकारणे हेच आपल्यासाठी खऱ्या अर्थाने उत्सव ठरणार आहेत.
शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष मोठ्या अभिमानाने आपण करतो. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि रोमांचित आठवणींचा जयजयकार करतो. जसा जसा शिवजयंती उत्सव जवळ येत जातो, तस तसे, आपले “डीपी” बदलायला लागतात. शिवजयंतीचा दिवस मावळायला लागतो आणि मागे मात्र अंधार उरतो. उत्सवी सोहळे साजरे करण्यापुरतेच शिवरायांना आपण सीमित ठेवणार आहोत का? याचा विचार करण्याची आता नितांत गरज आहे. कदाचित यातूनच आचार-विचारांचा उष:काल निर्माण होईल, हीच अपेक्षा.

!! जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र !!

Previous article
Next article

43 Comments to

  1. शस्त्ररूपी लेखणीतून वास्तवावर अगदी सूचक वार केला आहे.जबरदस्त

    उत्तर द्याहटवा
  2. सध्याच्या काळात जे शिवाजी महाराजांच्या नावाने चुकीचे चालू आहे याचं इत्यंभूत माहिती दिली . यामुळे खरं पुढील पीढी सुधारणा करून नवीन विचार समाजात आणु शकेल. खूप छान निबंध लेखन केले आहे .

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र

    उत्तर द्याहटवा
  4. खुप छान अक्षय, जय जिजाऊ जय शिवराय

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads