Blog
स्पर्धक क्रमांक ५७ राहुल सुरेश कबुरे सांगली
" राजा शिवछत्रपती"
"इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
*"राजा शिवछत्रपती"*
मानाचा मुजरा!"
" प्रौढ प्रताप पुरंदर...
क्षत्रिय कुलावंतस...
सिंहासनाधीश्वर...
महाराजाधिराज...
श्री.छत्रपती शिवाजी महाराज!!"
छत्रपती शिवाजी महाराज
मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,उत्कृष्ट योद्धा एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा "छत्रपती शिवाजी महाराज" यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला.
शत्रूंविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म
...आणि तो सोनियाचा दिवस उजाडला फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ मध्ये इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी जुन्नर जवळ शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले.आणि सर्वत्र आनंदी-आनंद झाला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून राजेंचे नाव"शिवाजी"ठेवले.
शिवरायांचे बालपण
राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. त्यांना श्रीरामाच्या, श्रीकृष्णाच्या ,भिमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच संत ज्ञानेश्वरांचे ,संत नामदेवांचे आणि संत एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत.
शूरवीरांच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि त्यांचे गुरू दादोजी यांनी त्यांना युद्धकौशल्य नीती शास्त्रात पारंगत केले.
शिवरायांचे शिक्षण
शिवरायांचे वडील शहाजीराजे यांनी शिवरायांना युद्धकला शिकण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली.घोड्यावर बसणे,कुस्ती खेळणे,दांडपट्टा फिरवणे,तलवार चालवणे, उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, शत्रूंच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या.
शिवरायांचा विवाह
शिवरायांच्या पत्नीचे नाव सईबाई असे होते.त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.
स्वराज्याची शपथ
रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजीराजे आणि मावळे जमली होती त्यावेळी शिवाजी राजे म्हणाले," *आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य*"! तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्षीने ठेवून आपण प्रतिज्ञा करू.स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार."
मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले "हिंदवी स्वराज्याच्या रुपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया." असे छत्रपती शिवाजी महाराज निश्चयाने म्हणाले आणि सर्वांनी शपथपूर्वक स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली.
साम्राज्यविस्तार व स्वराज्य व्यवस्था
सन १६५५ पर्यंत छत्रपती शिवाजी राजांनी पुणे,चाकण ,बारामती ,इंदापूर या भागावर ताबा मिळवला होता.
तोरणा गड, राजगड आणि पुरंदर गड त्यांनी मिळवले होते.तसेच कोंढाणा ,रोहिडा, पन्हाळगड, रायगड, प्रतापगड हेही किल्ले त्यांनी युक्तीने व पराक्रमाने काबीज केले स्वराज्याची घौड दौड जोरात सुरू होती.
छत्रपती शिवाजी राजांनी कोकणात आरमार बांधणीचे काम केले.त्यांनी समुद्र काठावर "पद्मदुर्ग ,विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग "सागरी किल्ले बांधले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती धोरण
महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात शेतीविषयक काही गोष्टी मांडल्या आहेत त्या पुढील प्रमाणे :-
१)नापीक जमीन पिकाऊ करणे.
२) पिकांचे गावकऱ्यांचे व
शेतकऱ्यांचे रक्षण करणे.
३) राज्यातील सर्व जमिनीचे
मोजमाप करून सारा
आकारणी करणे.
४) शेत जमीन लागवडीखाली
आणण्यासाठी विहीर ,कालवे,
पाटबंधारे काढून पाणी
पुरवठ्याची सोय केली जाते.
५) शेतीच्या महसुलाची व्यवस्था
योग्य केली जाते.
६) शेतीवर येणारा अतिवर्षाव,
दुष्काळ ही नैसर्गिक संकटे
येत असत. शिवाजीराजे संपूर्ण
पाहणी करून शेतकऱ्यांना सूट
देत असत.
७) धान्य, वस्तू शेतकऱ्याला नांगर
बैलजोडी व बिनव्याजी
कर्जपुरवठा करून
शेतकऱ्यांना सहाय्य केले जात
असे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक व परधर्मी याविषयी धोरण
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणारे व राष्ट्रीय ऐक्य वाढवणारे होते.
छत्रपती शिवाजी महाराज एका जातीपुरते, धर्मापुरते किंवा पंथा पुरते कार्य करणारे नव्हते तर ते समाजातील प्रत्येक जात, धर्म, पंथ,वर्ण या सर्वांनाच न्याय व सामाजिक समता देणारे राजे होते.
छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यात जिवा महाले, शिवा काशीद (नाभिक), सिद्धी हलाल (खाटीक) ,तानाजी मालुसरे, येसाजी कंक (कुणबी), सिद्दी इब्राहीम, दौलतखान (मुस्लिम), बाजीप्रभू देशपांडे,मुरारजी देशपांडे (ब्राह्मण) अशा विविध जाती-धर्माच्या लोकांवर शिवाजीराजांनी स्वराज्यातील महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती.
शिवराज्याभिषेक
तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे करविले.नवरत्ने अमोलिक जितकी कोषात होती.मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले.रायरीचे नाव रायगड ठेविले.
सप्तमहाल दियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके अणिली. सुवर्णाचे कलश व तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधान राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून मुहूर्त पाहिला शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३स मुहूर्त पाहिला.
राजे ब्रम्ह मुहूर्तावर उठले स्नान करून शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातेचे दर्शन घेतले .कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली व गडावर गेले.
राजे सभागृहात आल्यावर साडेचार हजार राजांनी मानवंदना केली व राजे बत्तीस मणांच्या सिंहासनाकडे गेले. राजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले.
गागाभट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेविषयी धोरण
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या कल्याणासाठी रयतेच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण करण्यासाठी, रयतेचे दुःख दूर करण्यासाठी शिवशाही निर्माण केली
प्रजा अत्यंत सुखी समाधानी होती ,गुण्यागोविंदाने राहत होती, शिवशाहीचं प्रशासन अत्यंत स्वच्छ होतं,कठोर पण तितकच न्यायी होतं.
छत्रपती शिवाजी राजांना रयतेविषयी जिव्हाळा, आपुलकी होती.आणि रयतेवर कोणताही अन्याय, दुःख होऊ नये जनता सुखी व्हावी असे राजेंना वाटत होते.
प्रेरणादायक छत्रपती शिवाजी महाराज
राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने व पिता शहाजीराजांच्या मार्गदर्शनाने शिवाजीराजेंनी स्वराज्याचा संकल्प पूर्ण केला. शिवाजी महाराज अखिल मानव जातीचे उद्धारक बनू शकले .
उच्चतम ध्येयवाद, भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि यांचे मार्गदर्शन शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातून मिळते.
हे राज्य एकट्या शिवबाचे नाही ,तर लाखो कष्टकरी, शेतकरी ,मावळे, रयतेचे आहे ही भावना त्यांनी वृद्धिंगत केली. महात्मा ज्योतिबा फुले कुळवाडी भूषण म्हणून शिवरायांचा गौरव करतात.
अशा या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक व आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजीराजे यांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी झाला.
राजे
छ :- छत्तीस हत्तीचे बळ
असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जिजाऊंचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :-जनतेचा राजा,
म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज.
"छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
Previous article
Next article
👌👌👌👌
उत्तर द्याहटवा