स्पर्धक क्रमांक ९९ नेहा राजेंद्र आंबोले बदलापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ९९ नेहा राजेंद्र आंबोले बदलापूर

  राजा शिवछत्रपती    

         प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”
हि ओळ तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकली असेलच. हे शब्द आहेत राजमुद्रेतले, जे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यच प्रतीक आहे. हे शब्द जेवढे स्फूर्तिदायी वाटतात तेवढाच विस्मयकारी त्यांचा अर्थ हि आहे, तो असा,
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सारे विश्व त्याला  जसे वंदन करते, तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल.
एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्टीत अशा मराठा साम्राज्याला. 
             गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या शिवरायांना स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या 
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
   महाराज म्हणजे 
निश्चयाचा महामेरू . 
बहुतजनांसी आधारू  अखंडस्थितीचा निर्धारू
 असे श्रीमंत योगी रयतेचा हा राजा . 
   जाणता राजा ज्या शतकात जन्माला आला त्या इ.सन 1627 दरम्यान संपुर्ण भारतावर मुगलाचे अधिपत्य होते.
उत्तरेला शहाजहान, विजापुर ला मोहम्मद आदिल शहा आणि गोलकोंडयाला सुलतान अब्दुल्ला कुतुब शहा यांचे शासन होते. समुद्र किनारे पोर्तृगिजांच्या ताब्यात होते.आदिलशहाच्या सेनेत शहाजीराजे भोसले उच्च पदावर कार्यरत होते . शिवाजी महाराजांच्या जन्म १९ फेब्रुवारी 1630 ला जुन्नर जवळ शिवनेरी गडावर जिजाबाईंच्या पोटी महाराज जन्माला आले, शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे ’’शिवाजी’’ असे नामकरण करण्यात आले. महाराजांना राज्यशासनाचे आणि युद्ध कौशल्याचे धडे राजमाता जिजाऊंकडून मिळाले. अगदी लहानपणापासून राम आणि कृष्णाच्या कथा ऐकून अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाली.पहिली गुरू आई आणि दुसरे गुरू दादोजी कोंडदेव यांच्या सानिध्यात आणि संस्कारांमधे महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रितीने गेले. दादोजींनी त्यांना युध्दकौशल्यात आणि नितीशास्त्रात पारंगत केले.
जिजाबाई महाराजांना राम कृष्णाच्या, शुरविरांच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर उत्तम संस्कार तर करतच होत्या त्या शिवाय तलवारबाजी, घोडयावर स्वार होणे यात त्यांना तरबेज करत होत्या.मुघल साम्राज्य आपल्यावर करत असलेल्या अन्यायाची जाणीव त्यांना झाली. आणि या अत्याचारातून आपल्या जनतेला मुक्त करण्याचा वसा त्यांनी उचलला.
द्रष्टा सेनापती, सुजाण प्रशासक, सशक्त राष्ट्रनिर्माता आणि कल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवराय महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात अमर झाले. अखंड महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्यातील ऐक्य निर्मितीचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. म्हणूनच संत रामदासांनी अत्यंत समर्पक शब्दात त्यांचा मोठेपणा मान्य केला आहे.जागतिक इतिहासात अनेक राज्यकर्ते हे स्वत: धाडसी आणि मुत्सद्दी सेनापतीही असल्यानं ते यशस्वी होऊ शकल्याची उदाहरणं आपण पाहत आलो. सिकंदर, सीझर, नेपोलियन, समुद्रगुप्त व अकबरांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज हेही महान योद्धा व धाडसी सेनापती होते. ते स्वत: अनेक युद्ध मोहिमांमध्ये सहभागी झाले आणि हजारोंच्या सैन्याचं नेतृत्व केलेले होते. गनिमी काव्याचा व अत्यल्प लष्कराचा कौशल्यापूर्ण उपयोग करून त्यांनी शत्रूच्या विशाल सैन्याला वेळोवेळी नामोहरम केलं. या घटना महाराजांच्या अनेक यशस्वी युद्धनितीची साक्ष देतात.  अनेक लढायांमध्ये मोगल किंवा आदिलशहाचं सैन्य मराठय़ांच्या सैन्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त असूनही शिवाजी महाराजांना विजय प्राप्त होत राहिला, यातूनच त्याच्या मुत्सद्दी सेनापतीत्वाचा प्रत्यय येतो.
गनिमी कावा, हेरगिरी, लष्करी शिस्त, शिपायांचा मान, सैन्याची चपळता, अनपेक्षित हल्ले, शत्रूला बेसावध ठेवून चकविणं, कष्टाळू आणि प्रामाणिक लष्कराचा साधेपणा, कर्तृत्वानांचा यथोचित सन्मान, सेनापती व लष्कराची अजोड स्वामीनिष्ठा हे शिवराज्यातील सैनिकांच्या यशाचं गमक होते. अशा अलौकिक सैन्याच्या बळावर शिवाजी महाराज यशस्वी होऊ शकले. त्यासाठी त्यांची शिस्तबद्ध संरक्षण व्यवस्था कारणीभूत ठरली. त्यांनी घोडदळ, पायदळ, गड, जलदुर्ग, शस्त्रास्त्रं, तोफा, दारूगोळा आदी लष्करी सामग्रीची योग्य व्यवस्था केली. स्वराज्याला सर्वार्थानं लुबाडणा-यांकडे वेळोवेळी लूट करून मोहिमांसाठी धनाची ददात भासू दिली नाही. सूरतेच्या लुटीतून अनेक किल्ले बांधले व सिंधुदुर्गाचं काम सुरू केले. बेकार व गरीब शेतक-यांना सैन्यात सामावून घेऊन त्यांनी मराठय़ांचं लष्करी सामर्थ्य वाढवलं. जिवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर, मदारी मेहेत्तर, हिरोजी र्फजद, प्रतापराव गुजर व तानाजी मालुसरे यांसारखे जिवाला जीव देणारे अनेक सेनापती व सैनिक शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जिवाला जीव द्यायला तयार झाले. आपला छत्रपती, आपलं राज्य, आपली भूमी, आपला धर्म व आपल्या समाजाचं रक्षण करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी हजारो मराठी तरुणांच्या मनात निर्माण केली. पुढे ती मराठा स्वातंत्र्ययुद्धापर्यंत (६० वर्षे) कायम राहिली, हे शिवाजी महाराजांचे फार मोठं लष्करी कर्तृत्व होतं. त्यांनी विविध जमातीतल्या राष्ट्रीय सैन्याची निर्मिती केली. भविष्यात युरोपियनांशी लढावं लागेल, म्हणून आरमारी दल उभारलं. परकीयांशी लढताना आधुनिक शस्त्रांची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी पोर्तुगिज, इंग्रज, फ्रेंच यांच्याकडे वेळोवेळी दारूगोळा व तोफांची मागणी केली व काही प्रमाणात ते प्राप्त केलं. यातून महाराजांची उत्तम युद्धनिती दिसून येते. कुशल प्रशासक म्हणूनही शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व उठून दिसतं. त्यांनी अनेक मोहिमा केल्या, परंतु कुठल्याही प्रदेशाचं नुकसान केलं नाही. तसेच तेथे उत्तम पद्धतीची शासन व्यवस्था तसेच शांतता स्थापन केली. आपल्या स्वारीच्या वेळी शत्रूवर लुटालुट, जाळपोळ आणि नाहक अत्याचार त्यांनी कधीही केला नाही. यामुळेच शिवाजी महाराज हे न्यायी राज्यकर्ते ठरले. सरकारी अधिका-यांच्या नेमणुका करताना त्यांनी कधीही जातपात पाहिली नाही. शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे यासाठी आपली धोरणं कल्याणकारी पद्धतीनं आखली. सर्व भागांमध्ये स्वतंत्र आणि सक्षम प्रशासन व्यवस्था निर्माण केली. राजा, अधिकारी व प्रशासन हे प्रजेचे सेवक असतात, ही उच्च भावना शिवाजी महाराजांनी राज्य कारभार करताना बाळगली. जनतेच्या कल्याणावरच राज्याचं भवितव्य अवलंबून असतं, ही जाणीव महाराजांनी कायम ठेवली.  शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली म्हणूनच ते ख-या अर्थानं राष्ट्रनिर्माता ठरतात. परकीयांचं जोखड झुगारून आपली भूमी आणि समाज मुक्त व्हावा, हे त्यांचं राष्ट्रनिर्मितीचं कार्य श्रेष्ठ दर्जाचं होतं. मराठी माणूस, मराठी भाषा आणि संस्कृतीची त्यांना पुनस्र्थापना करण्यासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ही घटना भारतातील महान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून क्रांतिकारी ठरावी. कारण त्यातून मराठी माणसाच्या अंतकरणात राष्ट्रवादाची भावना पेटली. राज्य स्थापन केल्यानंतर शिवाजी महाराजांनी या राष्ट्र राज्याचं लोकराज्यात कसं रूपांतर होईल, यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आणि
 ‘प्रजा सुखे सुख राज! प्रजा राज हितम्’
 हे त्यांच्या स्वराज्य स्थापनेचं उद्दिष्ट होतं. जन कल्याणकारी नितीमान आणि न्याय्य या मूल्यांवर आधारलेले शिवाजी महाराजांचे राज्य हे मध्यकाळातील ख-या अर्थानं सुवर्णयुग होतं, असं म्हणता येईल.
        छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.
       शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना,अधिकार्‍यांना पगार सुरु केले.शेतकर्‍यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.
          छत्रपती शिवाजी महाराज 'रयतेचा जाणता राजा' होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात,
'कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील्,कोण्ही भाकर्,कोण्ही गवत्,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी,कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत.
 म्हणजे 
जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट होईल.तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन वर्तणुक करणे.कोण्ही....रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही.ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोणावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...'यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती .वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे!पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक न चुकता हार घालतात !
एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते.'साहुकार हे तो राज्याचे भुषण' असे महाराज म्हणत.              आजच्या,२१व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्या काळातही हे वाक्य फार महत्वाचे आहे.स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या राज्यकर्त्यांना या वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला.महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच.स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. 'हे राज्य व्हावे ही  श्रींचीच इच्छा आहे' असेही महाराज म्हणत.पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांनी सिंधुबंदीची प्रथा मोडुन काढली.ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल

श्री छत्रपती शिवाजी महाराज

"निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"

- समर्थ रामदास

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो,ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष  म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज.

"शिवरायांचे ते आठवावे रूप .. शिवारयांचा अठावावा प्रताप ...भूमंडळी " अशा आपल्या या अखंड प्रेरणा स्तंभाला आज परत एकदा स्मरण करण्याचे आवाहन आपणा सर्वांना करत आहे.

कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !

अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !

खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीची, तमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नाची, स्वराज्याच्या स्वप्नाची. सामान्य माणसाच्या स्वप्नातील स्वराज्याची, याच साठी शिवरायांनी जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचा. आपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला . म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर, जिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे-स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड,शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजे! आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे.लोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही; त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार बदलण्याची, आपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याची. देशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाही. काळ फार कठीण आहे मित्रांनो, गरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याची,डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, भाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याची; गरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!
        शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही,त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो.अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून,आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती,भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही. जिजाऊ मा साहेबांच्या, शिवबांच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.

    स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला,जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!
Previous article
Next article

13 Comments to

  1. खरच खुप छान...अप्रतिम असा लेख आहे.🔥'तुमचं आमचं नात काय "जय जिजाऊ जय शिवराय"श्रीमानयोगी श्री छत्रपती महाराजांना मनाचा मुजरा🙏🚩

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर .....अक्षरशः काटा आला अंगावर
    ...

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads