महाराष्ट्र
३ जुलैला आळंदी येथून पायी वारीची तयारी?, ३ जुलैला वारीसाठी आळंदीत एकत्र या; बंडातात्यांचे आवाहन
प्रतिनिधी : रविना यादव
कोरोनामुळे आषाढीच्या पायी वारीवर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबद्दल नाराजी व्यक्त करत ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी ३ जुलैपासून वारीच्या तयारीसाठी येत्या २ तारखेला ( ज्येष्ठ वद्य अष्टमी) आळंदी येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वारकऱ्यांना केले आहे.
गेल्या वर्षी आम्ही वारकऱ्यांनी हा निर्णय समजून घेतला. मात्र, यंदा लागोपाठ दुसऱ्या वर्षीही पायी वारीची परवानगी सरकारने एकतर्फी नाकारली. कोरोना संकट असूनही निवडणुका होतात, राजकीय पक्षांच्या कार्यालयांची उद्घाटने शेकडोंच्या उपस्थितीत पार पडतात. साखर कारखाने जेवणावळी घालतात, फक्त शिस्तबद्ध वारीवर निर्बंध घातले जातात. याला विरोध आहे, असे बंडातात्या यांनी म्हटले आहे. सातशे वर्षांपूर्वी सामूहिक पद्धतीने दिंडी वाटचालीची प्रथा सुरू झाली. श्री नारायण महाराजांनी या दिंडी समाजाचे संघटन करून ज्ञानोबा-तुकोबारायांच्या पादुका पालखीतून नेण्याची प्रथा चालू केली. दरवर्षी देहू-आळंदी या मार्गे हा सोहळा चालू लागला. तेव्हापासून २०१९पर्यंत तो अखंड चालला. मात्र गतवर्षी कोरोनाचे थैमान महाराष्ट्रात असल्याने सरकारने मनाई केली. परिस्थितीचे गांभीर्य जाणून संप्रदायाने हा निर्णय मान्य केला व पादुका प्रथमच वाहनातून गेल्या. यंदाही हेच होणार असेल तर मात्र आपला विरोध असल्याचे बंडातात्यांनी म्हटले आहे.
पालखी प्रस्थानाची तयारी पूर्ण ,श्रीक्षेत्र आळंदी, देहू येथे संचारबंदी
आषाढी वारीचा सोहळा उंबरठ्यावर आला आहे. मात्र, कोरोना संसर्ग संकटाची छाया या वर्षीच्या वारी सोहळ्यावरही असल्याने निर्बंधांचे पालन अत्यावश्यक आहे. श्रीक्षेत्र आळंदी व देहू येथे दोन्ही संतश्रेष्ठांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. पायी वारीसाठी कोरोना संसर्ग संकटामुळे निर्बंध जारी केल्यामुळे श्रीक्षेत्र आळंदी व देहू, येथे २८ जून ते ४ जुले दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी धर्मशाळा, भक्तनिवास, मठ तसेच हॉटेल्स, उपाहारगृहांवर बंदी घातली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा