स्पर्धक क्रमांक ८८ सुप्रिया सचिन बाचीम पनवेल - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ८८ सुप्रिया सचिन बाचीम पनवेल

राजा शिवछत्रपती

निश्चयाचा महामेरू!बहुत जनासी आधारू
अखंड स्तिथीचा निर्धारु!श्रीमंत योगी!!
यशवंत,कीर्तिवंत!सामर्थवंत,वरदवंत
पुण्यवंत,नीतीवंत!जाणता राजा!!

शिवरायांचे आठवावे रूप!शिवरायांचा आठवावा प्रताप,
शिवरायांचा आठवावा साक्षेप!भूमंडळी!!

शिवरायांचे कैसे बोलणे!शिवरायांचे कैसे चालणे,
शिवरायांचे सलगी देणे!कैसी असे!!

सखळ सुखाचा केला त्याग!करुनी साधिजे तो योग
राज्यसाधनाची लगबग!कैसी केली!!

    स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.
      हिंदूंच्या राज्याचे काही विशेष आहेत.शत्रूशी लढताना त्यांचे विजय होत नाहीत, असे नाही. विजय होतातच पण यांचा विजय झाला म्हणजे शत्रूचा मोड होत नाही. त्यांचे राज्य कमी होत नाही. त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही. या विजयी राजाचे राज्य वाढत नाही. विजय मिळाला तरी याचे सामर्थ्य खच्ची झालेले असते. ते भरून निघत नाही, म्हणून असे दिसते की, पराजयात समुळ नाश. विजयात थोडे सामर्थ्य वाढावे, परजयात प्रदेश कमी झाला तरी सामर्थ्य व जिद्द टिकावी हा हिंदूंचा नवा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झाला.

         शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९वफेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शहाजीराजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते. "शिवाजी राजे धार्मिक होते; पण धर्मभोळे नव्हते.कठोर होते; पण क्रूर नव्हते. साहसी होते; पण आततायी नव्हते. व्यवहारी होते; पण ध्येय शून्य नव्हते. उच्च ध्येयाची स्वप्ने पाहणारे स्वप्नाळू होते. ही स्वप्ने वास्तव्यात उतरविणारे कठोर वास्तववादी हे त्यांचे स्वरूप होते.

         शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते. बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली. कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते. माता जिजाऊ रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत. त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले. शहाजीराजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत.

         शिवरायांचे लग्न किशोर वयातच झाले होते. जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई हिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले. शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचा रयतेवर होणारा छळ अनुभवात येत होता. त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला. त्यांनतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले.

       “अफजलखान वध”, “शायीस्ते खानाची बोटे कापणे” या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका, या बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे. याव्यतरिक्त पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून त्याला सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषाला साधले. हे राज्य उभे करीत असता जनतेच्या ऐहिक कल्याणाची जबाबदारी राजाची आहे हे ते कधी विसरले नाही.  अनेक लढाया ते लढले; पण त्यासाठी प्रजेवर त्यांनी कधी नवे कर लादले नाहीत. "मी शत्रूशी शत्रू म्हणूनच वागलो, मित्राला दगा दिल्याचे दाखवा" असे त्यांचे आव्हान होते.

कौल देऊन गावे वसविणे,शेतसारा निश्चित करणे, वतनदारीला आवर घालणे,किल्ल्याची कोठारे भरून ठेवणे,शेतकऱ्यांना बी-बियाणे,नांगर, अवजारे यासाठी कर्जाची सोय करणे,भाषा सुधारण्यासाठी राज्यव्यवहारकोष,पंचाग सुधारण्यासाठी करणकौस्तुभ,धर्म सुधारण्यासाठी प्रायश्चित्त देऊन हिंदू करून घेणे,वीरांचे कौतुक आणि पंडितांचा सन्मान या सर्व बाबतीत सदैव दक्ष असणारे शिवराय इतिहासात ठायी ठायी आपणांस दिसतात.आणि एवढे करूनही त्यांचे रूप एकाकीच भासते.

         शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने! प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले. इ.स.१६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या.

           शिवाजीराजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते. तसेच स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजी राजे सफल झाले होते. आता परकीय सत्तांनी शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली.  असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तुत्वाने आणि पराक्रमाने “छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेला आहे.

        शिवाजी महाराजांचे राज्य स्वतःचे राज्य नव्हते, प्रजेचे राज्य होते.ते राज्याचे उपभोगशुन्य स्वामी होते "श्रीमानयोगी" होते.आपले शौर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेल्या, मृतप्राय समाजाला शुद्धीवर आणायचे,वर मान करून आपल्या हीनदीनतेस कारणीभूत झालेल्या परकीय राज्यकर्त्यां विरुद्ध दंड थोपटून राहण्याचे सामर्थ्य त्यांनी निर्माण केले.

'साजी चतुरंग बिररंगमे तुरुंगे चढी,
सरजा सिवाजी जंग जीतन चलत है!
भूषण भनत नाद बिहद नगारण के,
नदी नद मद गैबरणके रलत है!'
'तनियॉ न तिलक सुयनिया पागनीयॉ
घामै घुमरती छोडी सोजीयॉ सुखन की!!'

' भूपन भनत महावीर बळकन लागो,
सारी पातशाही के उडाये गये जियरे!
तमक ते लाल मुख सिबा को निरखी भये, 
स्याह मुख नौरग सिपाह मुख पियरे!"

भूषन भनप भाग्यो कासीपती विश्वनाथ, 
और कौन गिनतीमे भूली गती भब की!
चारो वर्ण धर्म छोडी कलमा निवाज पढी,
सिवाजी न होतो तो सूनती होत सब की!!

12 Comments to

  1. अप्रतीम
    महाराष्ट्राचे स्वाभिमान आणि अभिमान छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩

    उत्तर द्याहटवा
  2. ।।जय शिवराय।।
    ।।तुमच आमच नात काय
    जीजाऊ जय शिवराय।।

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान
    जय भवानी जय शिवराय🚩🙏💐🙏🚩

    उत्तर द्याहटवा
  4. खुप छान ..
    !! जय भवानी.. जय शिवराय !!

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads