स्पर्धक क्रमांक ११७ निखिल खटांगळेकर कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ११७ निखिल खटांगळेकर कोल्हापूर

राजा शिवछत्रपती

सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनताशिवाज जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा खिताब  बहाल केला.
महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशहाच्या, सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त केले.शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण-घडण केली. 
सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.
स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता. शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवराय राजकारण धुरंदर, दूरदृष्टीचे होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात होते. सागरात आरमार जय्यत तयारीत होते. अनेक शूर, लढवय्ये, पराक्रमी वीर स्वराज्याच्या शत्रूचा बीमोड केला.
शत्रूचा बीमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात, न्याय मिळत होता. अपराध्यांना शासन होत होते. शेतकऱ्यांची गा-हाणी दूर होत होती. 
प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या. स्वराज्याचा विस्तार झाला होता. अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खऱ्या अर्थाने 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' याचा प्रत्यय आणून दिला होता.
जनतेच्या मनातील स्वातंत्र्याकांक्षेचे शिवाजीमहाराज प्रतिनिधी होते.  'लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही.'एका सामान्य जहागिरदाराच्या मुलाने मोगल बादशाहीला आव्हान देणे म्हणजे सामान्य बाब नव्हे.
 खरोखर ‘स्वत:च्या हिंमतीवर, समोर कोणी मार्गदर्शक नसताना मध्ययुगीन भारतात नवीन रस्ता बांधून दाखवणारे ते कल्पक पुरुष होते,' स्वराज्य स्थापन करताना जीवाला जीव देणारे साथी-सोबती त्यांनी निर्माण केले. स्वराज्य स्थापन करताना त्यांच्यापुढे कठीण अडचणी आल्या. संकटांचे महापूर आले. परंतु ते हरहुन्नरी, निधड्या छातीचे, गंभीर, योजक, प्रसंगावधानी लोकनायक होते. त्यामुळे अफजलखानाची भेट असो, की शाहिस्तेखानावर छापा असो, किंवा आग्ऱ्याची नजरकैद असो, ते सर्व प्रसंगांतून सहीसलामत सुटले.
शिवाजीमहाराजांचे राज्य स्वत:चे राज्य नव्हते. प्रजेचे राज्य होते. ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. 'श्रीमान योगी' होते. आपले शौर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेल्या, मृतप्राय समाजाला शुद्धीवर आणायचे, वर मान करून आपल्या हीनदीनतेस कारणीभूत झालेल्या परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध दंड थोपटून राहण्याचे सामर्थ्य त्यांनी निर्माण केले.
सर्व धर्मांना, मतांना, आचारांना त्यांचे सादर व सप्रेम संरक्षण होते.
 प्रजेला अत्यंत शुद्ध समतोल, स्वस्त व जलद न्याय मिळण्याची सर्व व्यवस्था महाराजांनी केली. 
रोख आर्थिक व्यवहार अमलात आणून सरंजामशाही मोडून काढणारा हा पहिलाच राजा. लष्करी कारभाराची व्यवस्था त्यांनी तशीच डोळसपणे आखली.
 स्वत:चे त्यांचे चारित्र्य निष्कलंक, स्वच्छ होते. शुद्ध मन, सद्भावना व सरळ स्वभाव हे त्यांचे विशेष. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. प्रजेच्या सुखाचा विचार करणारा व दुःखाचा नाश करणारा हा लोक-नायक होता. खऱ्या अर्थाने हा रयतेचा राजा होता. त्यांच्या सद्गुणांचा वारसा मराठी मनाला व मराठी लोकांना लाभला आहे.
अखंड परीश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच. तरीही त्याची तमा न बाळगता ते शेवटपर्यंत कार्यरत होते. अखेर इ. स. १६८० मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले.
Previous article
Next article

10 Comments to

  1. जय जिजाऊ जय शिवराय

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads