स्पर्धक क्रमांक ३९ प्रदीप अर्जुन घाडगे सोलापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ३९ प्रदीप अर्जुन घाडगे सोलापूर

*राजा शिवछत्रपती*


मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त *“राजा शिवछत्रपती”

आपण आज स्वातंत्र्यासाठी धडपडत आहोत. प्रबळ अशा परसत्तेशी आपण झुंज देत आहोत. मध्येच निराशा घेरते. अशाप्रसंगी कोणाचे स्मरण करावे, कोणाची मूर्ती डोळ्यांसमोर आणावी? कोणाचे ध्यान करावे, कोणाजवऴ स्फूर्ती व प्रेरणा मागावी? अंत:करणात अतूट व अखूट असा ध्येयवाद व आशावाद कशाने निर्माण होईल. कितीही विपत्ती येवोत, अडचणी आ पसरून उभ्या असोत, त्या सर्वांतून मार्ग काढीत आम्ही आमचे ध्येय गाठूच, असा अमर विश्वास कोण बरे आपणास देईल? कोण प्रकाश देईल? कोण मार्ग दाखवील?

शिवरायाच्या वेळची देशस्थिती मनासमोर आणा. किती विपन्न दशा होती! उत्तर हिंदुस्थानात मोगलांचे राज्य होते. हिंदू राजेमहाराजे मोगलांचे अंकित झाले होते. धर्माची अवहेलना होत होती. मंदिरे उध्वस्त केली जात होती. बाटवाबाटव होत होती. ठायीठायी सरदार, जहागीरदार, जमीनदार यांची सत्ता. जनता त्रस्त झाली. धर्मही उरला नाही, खायलाही उरले नाही.

दक्षिण हिंदुस्थानातही तोच प्रकार. मुसलमानांच्या लोंढ्याला दोनशे वर्षे विजयनगच्या साम्राज्याने रोखले. परंतु पुढे तालीकोटच्या लढाईत हा कोट ढासळला; आणि सर्वत्र मुसलमानी सत्ता पसरली. दक्षिण हिंदुस्थानात पाच पातशाह्या झाल्या. त्या त्या ठिकाणचे मातब्बर हिंदु ह्या शाह्यांची सेवा करु लागले. गरिबांची दैना होऊ लागली. कोठे आधार दिसेना सर्वत्र अंधार व निराशा होती.

मुसलमानी राजे सक्तीने धर्मप्रसार करीत होतेच. परंतु हिंदू धर्मातील तुच्छ मानलेल्या जातींतील हजारो-लाखो लोकदेखील नाइलाजाने मुसलमानी धर्माचा स्वीकार करू लागले. मुसलमानी फकीर विरक्तपणे धर्माची गीते गीत गावोगाव हिंडत. हातात कंदील व मुखात धर्माचे सोपे गीत! हे शेकडो त्यागी फकीर मुसलमानी धर्माचा संदेश देत होते. हिंदु धर्माचा संदेश कोण देणार म्हणूनच

एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळीकडे चमचमाट,
विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट,
अशा चिञ विचिञ वातावरणात "भवानी मातेच्या मंदिरात" शिवनेरी गडात।  
जन्मली एक वात जी करणार होती मुघलांचा नायनाट,
मराठ्यांचा सरदार हिँदवी स्वराज्याचा आधार शहाजीचा वारसदार जन्मले "शिवछत्रपती"                         

बालशिवाजीसमोर स्वातंत्र्याचे भव्य ध्येय उभे राहिले. हे ध्येय कसे कृतीत आणायचे? रामाला वानरांनी साहाय्य केले. मला कोण करील? गरीब मावळे करतील. हे तरूण शेतकरी करतील. मोठमोठे इनामदार, जहागीरदार, जमीनदार हे मदत करणार नाहीत हे शिवरायाने जाणले. ज्यांना खायला नाही, ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही तेच उठतील. जिकडे पाहावे तिकडे गढीवाल्यांचे राज्य. हे गढीवाले विजापूरकरांचे मिंधे असत व इकडे गरीब जनतेला लुटीत. शेतक-यांची शेते, त्यांची फळझाडे, त्यांचे गवत-सारे आधी गढीवाल्यांसाठी. शिवरायाने विजापूरकरांविरूद्ध, गढीवाल्यांविरूद्ध, बंड उभारले. बंड कसे उभारायचे? पैसा कुठून आणायचा? सैन्य कसे निर्मायचे? शस्त्रात्रे कोठून आणायची? कसे लढायचे? कोठून लढायचे? सारे प्रश्न होते. बालशिवाजी व त्याचे सवंगडी याची चर्चा करीत. शिवरायाला गर्व नव्हता. गोकुळातील कृष्ण गोपाळबाळांत मिसळे, काला करी, खेळे, तसे हे शिवराय होते. डोंगर चढावे, दरीखोरी पाहावी; घोडदौड करावी; पट्टा, भाला, समशेर, सारे शिकावे. तरूणांबरोबर लुटुपुटीच्या लढाया कराव्या असे चाले. समान विचारांचे, समान ध्येयाचे तरूण जमू लागले, गोष्टी गाऊ लागल्या. तरूणांचे जथे ठायी ठायी वाढू लागले. कर्माची प्रतीक्षा करू लागले.

समुद्राच्या पाण्यात जंजिरा ची सावली
शिवरायांना जन्म देणारी धन्य ती जिजिऊ माऊली

      अशा या जिजाऊचा लेक म्हणतोय
“मी गढीवाल्यांच्या गढ्या नष्ट करण्यासाठी आलो आहे” हे शिवरायांचे शब्द वा-यावर सर्वत्र गेले. महाराष्ट्रातील सारी गरीब जनता एक होऊ लागली. शिवरायांनी सर्वांना जवळ केले. ब्राह्मण, प्रभू, मराठे, अठरापगड जातींतील तेजस्वी, निश्चयी, त्यागी माणसे जमू लागली. मराठा म्हणजे आडनावी मराठा नव्हे; महाराष्ट्र ज्याला आपला वाटतो, महाराष्ट्र ज्याला मातृभूमी वाटते, महाराष्ट्रात दारूण दैन्य, दु:ख नसावे असे ज्यांना वाटते, ते मराठे. महाराष्ट्रातील मुसलमान ते जर महाराष्ट्रात गुण्यागोविंद्याने राहतील तर तेही मराठेच. या व्यापक अर्थाने शिवाजी महाराज मराठा शब्द समजत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात,  रमारात मुसलमानही होते. अफजुलखानाला भेटायला जाताना जे आठ वीर शिवरायांबरोबर होते त्यात एक मुसलमानही होता; आणि अफजुलखानाबरोबर त्याच्या  रक्षणार्थ हिंदू होते.

शिवराय केवळ मुसलमानांच्या विरूद्ध नव्हते. ते अन्यायाविरूद्ध होते. जनतेचा संसार धुळीस मिळवणा-यांविरूद्ध होते. छत्रपतींनी अफजुलखान सफा केले तसे चंद्ररावही सफा केले. ते जनतेचे कैवारी होते. पातशाहीच्या पाशातून, सरदार-जहागीरदार यांच्या पाशातून मुक्त करायला हा महापुरूष आला होता.
 
कितीही संकट आले तरी राजे गनिमी काव्याने लढायचे असाच एक प्रसंग सांगावासा वाटतो तो म्हणजे, 
दिल्लीहून सुटका! किती कठीण प्रसंग! केवढे धाडस! संभाजीस ताटात घेऊन जेवणारा ब्राह्मण! कशी उदात्तता, वीरता! दिल्लीहून शिवराय सुखरूप येतात. कोणी आणले? जनता- जनार्दनाने. या महापुरुषाला जनतेने जणू सांभाळले; आणि आईसमोर अंगाला राख फासलेले शिवराय उभे राहिले तेव्हा जिजामातेला काय बरे वाटले असेल! शिवराय सुखरूप आलेले पाहून कशी चैतन्यकळा संचरली असेल किती गूळ वाटला गेला असेल, किती उत्सव-समारंभ झाले असतील?

विजापूरकरांना दिल्लीपतीचा शह देऊन शहाजीराजांना सोडविल्यावर पुढे काही वर्षांनी जेव्हा शहाजीराजे भेटीला येत होते, तेव्हाचे शिवरायांचे ते विनयमधुर वर्तन! ते पायी सामोरे गेले. पित्याच्या चरणांवर त्यांनी मस्तक ठेवले. पित्याने प्रतापी पुत्राला हृदयाशी धरले. किती गोड उदात्त असा तो प्रसंग!

शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो शिवाजी!


शिवराय ही जणू देवाची देणगी. असा दैवी देण्याचा राजा कोठे पहायला मिळणार? शिवरायात खरोखर दिव्यता होती. ते विरक्त झाले असते तर थोर संत झाले असते. एकदा हंपीजवळ जंगलात जाऊन शिवराय ध्यानात रमले. जणू प्रभूशी ते एकरूप होऊ पहात होते. परंतु जनता तडफडत होती. ते पुन्हा जनतेकडे धावून आले. असा राजा होता.

पकडून आणलेल्या यवनीस पाहून ते म्हणाले, “आई, मी तुझ्या पोटी येतो तर किती सुंदर दिसलो असतो.” किती थोर उद्गार! असे उद्गार काढणारा पुरुष सामान्य नसतो.

असा हा जितेंद्रिय पुरुषसिंह होता. मुसलमानी धर्माची निंदा कधी त्यांनी केली नाही. कुराणाचा अपमान केला नाही मशिदी, दर्गे यांनाही इनामे दिली. परधर्मीयांस राजी राखले. असा राजा इतिहासात कोठे पाहावा, कोठे शोधावा! म्हणून समर्थ जगदंबेला म्हणाले, “तुझा तू वाढवी राजा! हे देवा, शिवछत्रपती तुझे देणे. त्याची भरभराट कर.”
भरभराट होत होती. परंतु आयुष्य कमी झाले. १६८० मध्ये वयाच्या अवघ्या पन्नासाव्व्या वर्षे महाराष्ट्राची ही पुण्यमूर्ती, ही स्फूर्तिदेवता, ही स्वातंत्र्यमूर्ती अंतर्धान पावली! परंतु शिवछत्रपती महाराष्ट्राच्या रोमरोमांत आहेत. ते अमर आहेत.

महाराष्ट्राचे हे मुके किल्ले स्वातंत्र्याचा संदेश देत आहेत! गरिबांचे प्रश्न हाती घ्या, त्यागाची परमावधी करा, नेत्यांचे ऐका, असे आदेश हे किल्ले देत आहेत. लोकमान्य म्हणत, “सिंहगडावर वर्षातून एक महिना राहतो, परंतु येथील ती हवा मला मग वर्षभर पुरते.” अशी ही स्वातंत्र्यप्रेरणा महाराष्ट्रातील किल्ले सदैव देतील. रायगड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, पन्हाळा रांगणा किती नावे! किती अमर आठवणी! किती तेजोवलये या किल्ल्यांभोवती! महाराष्ट्रा, यांचा संदेश नाही का तुला ऐकु येत?

शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!

महाराष्ट्रा! शिवछत्रपतीची खरी पूजा आपण घरोघर स्वातंत्र्यासाठी लढू तेव्हाच होईल. घरोघर शिवछत्रपतींची ती तेजोमय तसबीर ठेवा. तिला हार घाला. त्यांची उदात्त शिकवण अंगी आणा व स्वतंत्र व्हा.

शिवछत्रपती म्हणजे महाराष्ट्राची, भारताची अमृत-संजीवनी आहे. महाराष्ट्र उभा राहील. भारत स्वतंत्र होईल

जय शिवराय
Previous article
Next article

1 Comments

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads