Blog
स्पर्धक क्रमांक ६४ ऋतुजा संतोष परुळेकर सिंधुदुर्ग
राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी भोसले हे होते. शिवरायांचे बालपण खुप धामधुमीत गेले. त्यांनी वयाच्या *१२ व्या* वर्षापर्यंत आई जिजाऊच्या देखरेखेखाली व शहाजी राजांनी नेमलेल्या नामवंत शिक्षकाकडून अनेक कला , विद्या , भाषा , अवगत केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक सद्गुणांचा समुच्चय होय. स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा , स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची तयारी , शत्रूला निधड्या छातीने भिडण्याचे धैर्य , युद्ध , जिंकण्याकरिता प्रभावी डावपेच आखण्यासाठी आवश्यक असलेली कुशाग्र बुद्धीमत्ता , रणांगणात स्वतः आघाडीवर राहण्याची तत्परता , विलक्षण युद्धकौशल्य , साथीदारांविषयी अपार आत्मीयता , प्रजेविषयी वात्सल्य , यश मिळवून देणारी निर्णयक्षमता , समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या भल्याची चिंता , अधिकार्यांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक ती कठोरता , धार्मिक सहिष्णुता आणि या सर्वांचे अधिष्ठान म्हणून विशुध्द शील अशा असंख्य वैशिष्ट्यांनी मोहरलेले त्याचे चरित्र हा भारतीय लोकांच्या दृष्टीने युगानुयुगासाठी लाभलेला प्रेरणास्त्रोत आहे. ' रयतेचा राजा ' म्हणून विलास सोनावणे यांनी केलेले त्यांचे चरित्रचित्रण सर्व वाचकांना आणि विशेषतः तरुण पिढीला सदैव प्रकाशाचा मार्ग दाखवील , असा विश्वास वाटतो.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून जातीजातीत विभागलेल्या , परस्परांत भांडणार्या व मरगळ आलेल्या रयतेत नवचैतन्य निर्माण करून स्वत्व , स्वाभिमान जागृत करून स्वराज्य , स्वधर्म , स्वदेश , स्वसंस्कृती , स्वभाषा यांच्या रक्षणासाठी प्रेरणा देणारे युगपुरूष म्हणजेच रयतेचा राजा : छत्रपती शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्कालीन वर्णव्यवस्थेविरूद्ध विद्रोह करून गोरगरिब , पीडित , दुःखिताचे दुःख निवारणार्थ 'स्वराज्याची ' स्थापना केली. येथूनच भारत देशात फार मोठी सामाजिक क्रांती झाली आणि जनता मुक्त श्वास घेऊ लागली. हिंदवी स्वराज्य निर्माण केले. रायगड किल्ल्यावर राजधानी स्थापून ४०० वर्षांच्या पारतंत्र्यातून छत्रपतींनी महाराष्ट्रीय जनतेला मुक्त केले.
स्वराज्याची स्थापना केल्यानंतर महाराजांनी ' रयतेचे रक्षण स्वराज्याचे रक्षण ' या पद्धतीने राज्यकारभार करून प्रजाहितदक्ष आदर्श राजा अशी त्यांची ख्याती झाली. म्हणून १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या देशातील अन्य कोणत्याही राज्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आपल्या प्रजेच्या हितसंबंधाच्या रक्षणाची आणि कल्याणाची काळजी घेतल्याचे दिसत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज रयतेविषयी अत्यंत जागरूक असत. जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी , बैलजोडी , औतकाठी व बी - बीयाणे घेण्यासाठी मदत केली.
दुष्काळजन्य परिस्थितीत मदत करीत. शेतकर्याविषयीचे महाराजांचे धोरण खूप व्यापक स्वरूपाचे होते. शिरजोर वतनदाराच्या कचाट्यातून सर्वसामान्य रयतेची सुटका केली. प्रजेला समानतेची व न्यायाची वागणूक दिली.
विजेसारखी तलवार चालवून गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला,
वाघ नख्याने अफझलखानाचा कोथळा फाडून गेला,
स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला,
असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला
असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा