राज्यात आजपासून कवचकुंडले योजना
केंद्र सरकारने दसऱ्यापर्यंत देशात एकूण १०० कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने राज्यात सात दिवसांमध्ये दररोज किमान १५ लाख लसीकरण करून या कालावधीत एक कोटी लसीकरण केले जाईल. राज्य सरकारकडे सध्या ७५ लाख लसींचा साठा उपलब्ध असून आणखी २५ लाख लसी गुरुवारी मिळणार आहेत.आता लसींचा तुटवडा नाही, असे टोपे यांनी सांगितले.
करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी कवच कुंडले ही योजना जाहीर करण्यात येत आहे.
राज्यात निर्बंध शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली असताना लसीकरणाचा वेगही वाढविण्यात येत आहे. अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून त्यासाठी वेगाने सर्व जनतेचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केंद्राने दसऱ्यापर्यंत देशात १०० कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून महाराष्ट्रही इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी नाही. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही महाराष्ट्राने लसीकरणात मोठा सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी कवच कुंडले योजना राबवीत असल्याचे टोपे यांनी नमूद केले.
राज्यात १८ वर्षांवरील एकूण ९ कोटी १५ लाख एवढ्या नागरिकांना दोन्ही मात्रा द्यायच्या असून सुमारे सहा कोटी नागरिकांना पहिली मात्रा तर सुमारे अडीच कोटी नागरिकांना दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत, असे टोपे यांनी सांगितले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा