आषाढीपूर्वी वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी कार्यवाही करा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना - दैनिक शिवस्वराज्य

आषाढीपूर्वी वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी कार्यवाही करा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर, दि.13 : गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने आषाढी वारी वारकरी संप्रदायाच्या प्रथा-परंपराचे जतन करून मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती. कोरोना निर्बंध हटविल्याने यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर व पालखी तळावर कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. 

नियोजन भवन येथे आषाढी वारी 2022 पूर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भरणे बोलत होते. बैठकीला आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, तसेच मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व इतर पालखी सोहळ्याचे दिंडीप्रमुख उपस्थित होते.

श्री. भरणे यांनी सांगितले की, आषाढी वारी सोहळा आनंदी व्हावा, यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे. आषाढी वारीत वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी सर्व संबंधित विभागाने घ्यावी. पालखी मार्ग, विसावा आणि वारकऱ्यांचे मुक्काम ठिकाणच्या रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा. प्रत्येक विभागाला कामे नेमून द्यावीत. स्वच्छता, शौचालय सुविधा, इतर डागडुजीकडे लक्ष द्यावे. पोलीस, आरोग्य, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने नियोजनपूर्व तयारी करावी. प्रत्येक पालख्यांचा विसावा, मुक्काम, रिंगण ठिकाण यांच्या जागेबाबतच्या अडचणी सामंजस्याने सोडविल्या जातील. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी मुरमीकरण करावे,  

जळगावकर महाराज यांनी सरगम चौकात रेल्वे लाईनवर असलेल्या हाय व्होल्टेज तारेबाबत सांगितले. याबाबत श्री. भरणे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सोहळा प्रमुखांची बैठक घेऊन मार्ग काढावा. प्रदक्षिणा मार्गातील खाचखळगे दुरूस्त करावेत, पालखी सोहळ्यांना गॅस पुरविण्यात येईल.

आरोग्य विभागाने औषधसाठा आणि ॲम्ब्यलन्सबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी. 

जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले, विसावा, वारी मार्ग, रिंगण ठिकाणे आणि मुक्कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. काही उणिवा जाणवल्या असून त्या दुरूस्त करण्यात येत आहेत. 

वारीच्या नियोजनाबाबत श्रीमती पवार यांनी माहिती दिली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads