महाराष्ट्र
आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज :- निवृत्त कर्नल व्ही. एन. सुपनेकर
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर :- यावर्षी आषाढी यात्रा रविवार दिनांक 10 जुलै 2012 रोजी होणार आहे. ही आषाढी यात्रा शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडणेकामी यशदा पुणे यांचेमार्फत प्रशिक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. मॅनेजमेंट प्लॅननुसार होणाऱ्या गतिविधीमध्ये अडचण आल्यास जबाबदार असलेली यंत्रणा व त्यांची कार्य, अडचण निरसन करण्यासाठी लागणारा वेळ यासाठी पर्यायी टीमची व्यवस्था करणे तसेच मनुष्य व यंत्रसामग्री बाबीचा समावेश करून इंटिजेन्सी प्लॅन तयार करणे आवश्यक असते. त्यामुळे या आषाढी यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज असल्याचे यशदाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक निवृत्त कर्नल व्ही. एन. सुपनेकर यांनी सांगितले.
नियोजन भवन येथील सभागृहात पंढरपूर आषाढी वारी 2022 प्रशिक्षणाचे नियोजन करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत श्री. सुपनेकर बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा वारीचे इन्सिडेंट कमांडर संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त एन. के. पाटील, सहाय्यक आयुक्त आशिष लोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे., जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्री सुपनेकर म्हणाले की, सन 2016 च्या आषाढी वारीस पंढरपूर शहरात सुमारे 14 लाख भाविक दाखल झाले होते; तर यावर्षी किमान 16 ते 18 लाख भाविक आषाढी वारीस येतील असा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने अत्यंत दक्ष राहून वारीचे मॅनेजमेंट केले पाहिजे. यासाठी या वारीत सहभागी होणाऱ्या सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य अशा सूक्ष्म प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे त्यांनी सूचित केले.
पंढरपूर शहरात व मंदिराच्या परिसरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता बाळगावी. तसेच ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध अत्याधुनिक उपकरणांचा वापर करावा, अशा सूचना श्री. सुपनेकर यांनी दिल्या.
पंढरपूर शहराच्या बाहेरील परिसरात सुमारे 200 ते 300 धर्मशाळा असल्याचे निर्दशनास आले आहे. पंढरपूर शहरातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी धर्मशाळा यांचा वापर चांगल्या पद्धतीने करता येईल, असे श्री. सुपनेकर यांनी सांगून पोलीस विभागाने वाहतूक नियंत्रण चोखपणे करण्यासाठी योग्य तो आराखडा तयार ठेवावा. प्रदक्षिणा मार्गातील भाविक व घाटावरील भाविक यांच्यात स्वतंत्रता असावी याबाबत अचूक प्लॅन तयार करावा. तसेच पंढरपूर नगरपरिषदेने त्यांच्याकडील फायर नियंत्रण यंत्रणा तर आरोग्य विभागाने आरोग्य यंत्रणा अत्यंत दक्ष ठेवावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव व अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनीही आषाढी वारीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती बैठकीत दिली. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोलो यांनी वारीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा