महाराष्ट्र
जिल्ह्यातील शिवसेनेला ऊर्जितावस्था येण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्षम संपर्कप्रमुख द्यावा; शिवसैनिकांची मागणी
सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे झालेले खच्चीकरण, खिळखिळे झालेले पक्ष संघटन, वर्षानुवर्षे संपूर्ण जिल्ह्यात चिकटून बसलेले पदाधिकारी तसेच चार चार जिल्हाप्रमुख यामुळे गोंधळलेले शिवसैनिक दीड वर्षा पासून संपर्कप्रमुख नसल्यामुळे शिवसेनेची झालेली वाताहत याकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर लक्ष देणार का असा प्रश्न शिवसैनिकांतून विचारला जात आहे.
उद्या शुक्रवारी मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर बार्शी येथील एका कार्यक्रमासाठी उपस्थित येणार आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार तानाजीराव सावंत यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. सोलापूर जिल्हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. चार चार आमदार शिवसेनेचे या जिल्ह्यातून निवडून येत होते. शिवसेनेचा एक वेगळाच दबदबा सोलापूर शहर व तालुक्यात होता परंतु केवळ शिवसेनेतील गटबाजी, वैयक्तिक हेवेदावे, नवीन नेतेमंडळी कार्यकर्त्यांना शिवसेनेत येण्यापासून परावृत्त करणे, किंबहुना शिवसेना पक्ष म्हणजे आपलीच मालकी आहे या भूमिकेच्या कार्यकर्त्यांमुळे शिवसेनेचे संघटन सोलापूर जिल्ह्यात खुंटले आहे.
नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ८०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला कुठेही चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे आणि करमाळ्याच्या रश्मीताई बागल कोठेही पक्ष संघटनेत सक्रिय दिसत नाहीत. किंबहुना हे नेते मंडळी पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीच्या कळपात जाण्याची चर्चा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीट वाटपात झालेल्या गोंधळामुळे चार ठिकाणी शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता. अशी चर्चा आहे या पराभवाला संपर्कमंत्री तानाजीराव सावंत जबाबदार असल्याचा आरोप अनेक पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रातून केला होता. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व आमदार तानाजीराव सावंत यांच्या मातोश्री वरील झालेल्या तथाकथित मानापमानाच्या प्रसंगाचे तीव्र पडसाद सोलापूर जिल्ह्यात उमटून आमदार तानाजीराव सावंत यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर धाव घेऊन सावंत हटाव अशी भूमिका घेतली होती. या वादानंतर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी तात्काळ संघटनेतील महत्त्वाचे पदाधिकारी बदलून तानाजी सावंत समर्थक म्हणून ओळखले जाणारे तत्कालीन सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांना दूर केले व आपल्या विश्वासातील पुरुषोत्तम बरडे यांना विश्वासात घेऊन नवीन चार जिल्हाप्रमुख निवडले. या घडामोडी पासून सोलापूर जिल्ह्याची संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी असलेले तानाजीराव सावंत यांनी सोलापूरचा संपर्कच बंद केला यामुळे संघटना विस्कळीत झाली. तेच तेच चेहरे तेच तेच पदाधिकारी याला शिवसैनिक कंटाळले असून शिवसेनेत वर्षानुवर्षे प्रामाणिक काम करणाऱ्या नवीन नेतृत्वाला काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी शिवसैनिकांची आहे.
सोलापूर जिल्ह्याला एका चांगल्या संपर्कप्रमुख ची गरज असून तो मुंबईलाच असावा.
सोलापूर जिल्ह्यातील संपर्कप्रमुख नेमला कि संघटनेचे गटबाजीमुळे कसे तीन-तेरा होतात हे गेली चार वर्षात दिसून आले आहे.स्वतःच्या मर्जीतील पदाधिकारी नेमण्याच्या हट्टापायी पक्षसंघटन विस्कळीत झाले आहे.
८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या पक्षाच्या भूमिकेमुळे शिवसेना सर्व सामान्य जनतेत लोकप्रिय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारभारावर सर्वसामान्य जनता खुश आहे मात्र याचा कोणताही फायदा सोलापूर शिवसेनेला होत नाही. किंबहुना हा फायदा घेण्याची मानसिकता पदाधिकाऱ्यांची नाही
येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक अशा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेना मजबूत करायची असेल तर पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट झाले पाहिजे अशी भावना शिवसैनिकांतून व्यक्त होत आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मार्केट कमिटी जिल्हा बँक व दूध संघ यात शिवसेनेचे अत्यंत नगण्य स्थान आहे.
महाविकास आघाडीत असलेली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्ह्यात मजबूत होत असून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेमंडळी आठवड्याला सोलापूरच्या दौर्यावर असतात. शिवसेनेचा कोणताही वरिष्ठ पदाधिकारी पक्ष संघटनेसाठी गेल्या दिड वर्षात जिल्ह्यात आलेला दिसून येत नाही.
संपर्कप्रमुख संपर्कमंत्री म्हणून नेमलेले शंकरराव गडाख एकदाही करमाळ्याला आलेले नाहीत.
संपूर्ण जगात कोरोना संकट घोंगावत असताना ८० टक्के समाजकारण करणारी शिवसेना व त्याचे पदाधिकारी पाहिजे तेवढ्या प्रमाणात कोरोना संकटाचा लढाईत उतरलेले दिसत नाहीत.
बार्शी येथे मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या सचिव मिलिंद नार्वेकर येत आहेत. सध्या कोरोनाचे संकट हे महत्त्वाचे असले तरी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शिंदे व नार्वेकर यांनी पक्ष संघटनेचा ही आढावा घेऊन त्याच्यावर मलमपट्टी करावी. जिल्ह्यातील शिवसेनेला ऊर्जितावस्था येण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नवीन संपर्कप्रमुख (जिल्ह्या बाहेरचा) सोलापूर जिल्ह्याला द्यावा या अपेक्षेने शिवसैनिक उद्याच्या दौऱ्याकडे पाहत आहेत.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा