राजकीय
मुख्यमंत्र्यांनी प्रताप सरनाईक यांच्याबद्दल निर्णय घेतला असून लवकरच बातमी कळेल, संजय राऊतांचे सूचक विधान
प्रतिनिधी:रविना यादव.
शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि युतीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या. दरम्यान आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रताप सरनाईकांविषयी भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राविषयीही महत्त्वाचे भाष्य केले आहे. यासोबतच प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील आणि त्यांच्याविषयी लवकरच बातमी कळेल असे सूचक विधान राऊतांनी केले आहे.
पक्षसंघटेचे काम करणे महत्त्वाचे
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवास्थानी भेट घेतली. जवळपास दोन तास यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, 'शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री आहेत. मात्र, आज माझी चर्चा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. संघटनात्मक काम देखील महत्त्वाचे आहे. भविष्यात पक्ष मजबूत असेल, तर सरकार जास्त काळ टिकेल आणि मुख्यमंत्री देखील आमचाच राहिल. त्यासाठी पक्षसंघटेचे काम करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सरकार विषयीही चर्चा झाली.' असेही राऊत म्हणाले.
सरनाईक हे आजन्म ते शिवसेनेतच राहतील
यामध्ये प्रताप सरनाईकांविषयी झालेल्या चर्चेविषयी संजय राऊतांनी माहिती दिली. ते म्हणाले की, 'प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यांनी त्यांची भावना या पत्रात व्यक्त केली. सरनाईक हे आजन्म ते शिवसेनेतच राहतील असं ते म्हणाले. मी हे साहेबांनाही सांगितले आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात लवकरच तुम्हाला एक बातमी मिळेल असेही राऊत म्हणाले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा