स्पर्धक क्रमांक ००९४ : सीमा नितीन शेट्ये रत्नागिरी - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००९४ : सीमा नितीन शेट्ये रत्नागिरी

निबंधाचा विषय : पर्यावरणाचे महत्त्व

 'भला जन्म हा तुला लाधला। खुलास हृदयी बुधा। 
         धरिसी तरी हरीचा सेवक सुधा।।'
'भला जन्म हा'या उपदेशपर लावणीत शाहीर रामजोशी म्हणतात हे बुद्धिवान माणसा, सहजासहजी प्राप्त न होणारा हा मानव जन्म तुला लाभला आहे, तो सत्कारणी लाव, तुझ्या हातून सत्कार्य घडो। परंतु आयुष्य सत्कारणी लावायचा तर यासाठी तो देह सुदृढ, निरोगी, प्रसन्न, आनंदी असायला पाहिजे आणि प्रसन्न, सुदृढ, जीवनासाठी हा मानव जिथे वावरणार, मोकळा श्वास घेणार ते पर्यावरण विशुद्ध असावयास हवे. पर्यावरण या शब्दाचा अर्थ 'सजीव निर्जीव यांच्या आंतरक्रियांमधून साकार झालेले सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती' आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गात परमेश्वराने सुंदर आणि अद्भुत अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या आहेत. विविध रंगांची, गंधांची, आकाराची पाने, फुले, फळे, झाडे, पर्वतरांगा, डोंगर नद्या, पशुपक्षी इत्यादी अनेक घटक केवळ आपले मन प्रफुल्लित करत नाहीत तर निसर्गातील हा प्रत्येक घटक मानवाला भरभरून देत असतो आणि मग 'देता किती घेशील दो कराने' अशी आपली अवस्था होते.
   म्हणूनच जीवन जगताना अवतीभवतीचे हे घटक, त्याचबरोबर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते पर्यावरणाचा प्राण आहेत, कोणत्याही सजीव घटकाला जगण्यासाठी या प्रत्येक तत्त्वाचा आधार घ्यावा लागतो. सूर्याचे तेज त्याची ऊर्जा, पाणी, वायूरूपातील ऑक्सीजन, पृथ्वीवरील अन्नधान्यांची समृद्धी या सर्वांवर मानव जीवन आधारभूत आहे. आपल्याला सुखी समृद्ध जीवन जगायचे असेल तर निसर्गातील वरील घटक, पंचमहाभूते व पर्यायाने पर्यावरणाची साथ असायलाच हवी. आपल्या प्राचीन संतांनीं, महापुरुषांनी आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, 
          नगरेचि रचावी। जळाशये निर्मावी।
          महावने लावावी। नानाविधे ।।
माणसाने आपल्या निवाऱ्यासाठी सुंदर, आकर्षक रचना असणारी नगरे वसवावीत, जलाशय निर्माण करावीत तसेच मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करणारी वनांची निर्मिती करावीअसे म्हटले आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात राजाने आपला देश नदीमातृक (नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी) बनवावा, तलाव, नद्या, विहिरी या पाण्याचा साठा करून शेतीला पाणी पुरवावे असे म्हटले आहे. छत्रपती शिवरायांनी तर प्रत्यक्ष कृतीवर भर देताना जलव्यवस्थापन व वृक्षसंवर्धन या दोन्ही गोष्टींचे महत्त्व आपल्या आज्ञापत्रात विशद केले आहे. उंच उंच अशा गड-किल्ल्यांवर ही त्यांनी पाण्याचा साठा विपुल प्रमाणात कसा करता येईल याचा आदर्श घालून दिला आहे.
           पर्यावरणाची ही मौलिकता व पर्यावरण विषयक सामाजिक बांधिलकी जपत आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात 5 जून हा 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या सृष्टीतील पृथ्वी हा एकमेव असा आग्रह आहे जो सजीवांच्या निर्मितीसाठी समृद्ध अशा पर्यावरणाने संपन्न आहे. वसुंधरेचे हेच महत्त्व लक्षात घेऊन समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात या विषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी 22 एप्रिल हा दिवस 'वसुंधरा दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जात
              मानव हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे निसर्गाने मानवाच्या पदरात बुद्धीचे दान टाकले परंतु मानवाने मात्र निसर्गाच्या मुळावर घाला घातला खरंतर आपल्या बुद्धीचा कस लावून मानवाने पर्यावरणाचे संरक्षण, जतन करण्यास हातभार लावला पाहिजे. 'असेल समृद्ध पर्यावरण तर होईल सुखी जीवन' हे ब्रीद त्याने कायम ध्यानात ठेवायला हवे परंतु विज्ञान तंत्रज्ञानाच्या आजच्या अतिवेगवान काळात माणूस निसर्गापासून दूर होत चालला आहे निसर्गावर विजय मिळवण्याच्या नादात वाढत्या औद्योगिकरणामुळे जगातील सर्व शहरातील वातावरण दूषित झालेले आहे. कारखान्यातून, वाहनांतून बाहेर पडणारा धूर, एयरकंडीशन्स यामुळे पृथ्वीभोवतीचा ओझोनचा थर कमी होत गेलेला आहे. यामुळे असाध्य असे त्वचारोग होऊ लागले आहेत, तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे, निसर्गाचा समतोल ढासळू लागल्यामुळे पाऊसही लहरी झाला आहे त्यामुळेच कधी दुष्काळी उन्हाळा तर कधी संपूर्ण जनजीवन नेस्तनाबूत करणारी महापुराची गंभीर स्थिती. शिवाय जमिनीवरील पाण्याचा भाग ७० टक्के असतानाही उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करता न आल्यामुळे पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नद्या व धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भाग बेसुमार जंगलतोडीमुळे उजाड बनला आहे त्यामुळेच भविष्यकाळात पाण्याची व वीज पुरवठ्याची समस्या उभी राहणार आहे. 
            वरील सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी, निसर्गाची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीम खऱ्या अर्थाने हाती घ्यावी लागेल. 'पाणी म्हणजे आपले जीवन व झाडे म्हणजे आपला श्वास' हे लक्षात घेऊन पर्यावरणातील या दोन महत्त्वपूर्ण घटकांची जोपासना होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहराभोवती हिरव्या भिंती उभ्या करून प्रदूषणाचे परिणाम कमी करता येतील. परंतु केवळ वृक्षारोपण कार्यक्रमातून अब्जावधी रोपे लावून उपयोगाचे नाही, ही सर्व झाडे जगली असती तर संपूर्ण भारत हिरवागार दिसला असता म्हणून लावलेल्या झाडांची निगा राखणे  हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी झाड दत्तक योजना, वाढदिवसानिमित्त रोपभेट ,'पर्यावरण रक्षणात माझी जबाबदारी' अशा आशयाच्या निबंध, वक्तृत्व चित्रकला, रांगोळी अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाबाबत संवेदना निर्माण करणे महत्वाचे आहे.
पर्यावरणाच्या असंतुलनास जबाबदार आणखी एक घटक म्हणजे प्रदूषण. हवा, पाणी, भूमी, ध्वनी या प्रकारच्या प्रदूषणामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी कारखाने, उद्योगधंदे यातील सांडपाण्याचा योग्य निचरा,नद्या समुद्राच्या ठिकाणचे प्रदूषण कमी करून  त्यातील जलचरांना वाचविण्याची मोहीम, पाणी बचतीचे संस्कार, 'पाणी अडवा पाणी जिरवा' या महामंत्राचे महत्व, सुका कचरा, ओला कचरा याचे वर्गीकरण, प्लास्टिकचा कमीत कमी वापर,Reduce, Reuse,Recycle ही संकल्पना समजून घेणे त्या दृष्टीने आवश्यक आहे.  एकूणच पर्यावरणासंदर्भात भावी पिढीच्या ठिकाणी संवेदनशीलता निर्माण होणे आवश्यक आहे त्यासाठी शाळेतून, पर्यावरण शिक्षणाचे धडे देण्याबरोबर कुटुंबातूनच ही जाणीव जागृती निर्माण करण्यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. 
आपल्या स्वतंत्र देशाला डॉक्टर्स, वैज्ञानिक, इंजिनियर, शेतीतज्ज्ञ यांची जशी गरज आहे तसेच भावी पिढी पर्यावरणप्रेमी होणे ही काळाची गरज आहे. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत वृक्षवेली, डोंगरदऱ्या, प्राणी ,नद्या पर्वत यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.  वन्य पशूंना देवदेवतांचे वाहन म्हणून आदराचे स्थान आहे. तुळस, बेल, दुर्वा इ. अनेक वृक्षवल्ली, गंगा, यमुना, सरस्वती या नद्या, हिमालयासारखे पर्वतराज इ.घटक आपल्या कृषीसंस्कृतीचे द्योतक आहेत. यामागची दृष्टी आणि विचार महत्त्त्वाचा .
      आज कोरोना सारख्या महामारीला सामोरे जाताना कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे हे माणसाने समजून घेतले पाहिजे. शिवाय २६जुलै २००५,२०१९ आणि २२ जुलै २०२१ या महाप्रलयात निसर्गाच्या प्रकोपाला माणूसच बेजबाबदार आहे हे  पुढच्या पिढीने समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच पर्यावरणावर होणारा हा गंभीर परिणाम शेवटी या वसुंधरेला, निसर्गाला व एकूणच पर्यावरणाला बाधक आहे. 
विधात्याने निर्माण केलेल्या या वसुंधरेचे महत्त्व प्रतिपादन करताना समर्थ रामदास म्हणतात, 
          'बहूरत्ना वसुंधरा। 
              जाणं जाणो विचार करा।।'
समर्थांनी प्रतिपादन केलेल्या या बहूरत्नांची खाण असणाऱ्या वसुंधरेचे व पर्यायाने पर्यावरणाचे महत्त्व जाणून घेऊया, माणसातील संवेदना जागृत करूया,
चला पर्यावरणप्रेमी सुखी, समृद्ध पिढी निर्माण करूया।।
Previous article
Next article

113 Comments to

  1. अगदी विषयानुरूप आणि प्रेरणादायी आहे.👍👍

    उत्तर द्याहटवा
  2. Excellent and exact matter which definitely inspires the reader!

    उत्तर द्याहटवा
  3. निसर्ग चित्रण व वास्तव चित्रण सुरेख

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान निबंध. ओघवती आणि शुद्ध भाषा. मुद्देसूद लेखन. फक्त एका ठिकाणी, ग्रह ह्या शब्दाऐवजी चुकून आग्रह असा शब्द पडला आहे . बाकी छान.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान मांडणी , समर्पक आशय , उदाहरणे सर्वं थरातील वाचकांस उपयुक्त

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान लिहिलंय,
    आज प्रत्येकावर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आली आहे. सीमा ताई काळानुरूप लिहिलंय...

    उत्तर द्याहटवा
  7. खुप छान मॅडम !
    या निसर्गप्रेमी कडून आपल्या प्रयत्नांना हरित शुभेच्छा !

    उत्तर द्याहटवा
  8. Excellent article,
    Most informative and writer has the knowledge of the native environment and the recent crisis

    उत्तर द्याहटवा
  9. A very nicely written and detailed article touching various points. Well done and Best Luck
    -Dipak Kesarkar

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads