महाराष्ट्र
अंशतः अनुदानित शाळा व महाविद्यालयांना वाढीव टप्पा देण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
समीर शेख प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली दि. २४ जुलै रोजी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
भेटीदरम्यान राज्यातील विनाअनुदान शाळांच्या सर्व प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक, 20 टक्के,40 टक्के, व 60 टक्के शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा कारण अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे निवृत्तीच्या वाटेवर आहेत.2016 पासून अनुदानाचा टप्पा जर प्रत्येक वर्षी वाढत गेला असता तर आज सर्व शाळा 100 टक्के अनुदानित झाल्या असत्या पण आम्हाला वाढीव टप्या साठी दरवर्षी आंदोलन करावे लागत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे असे कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले.
याबरोबर या अंशतः अनुदानित शाळा व महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवा संरक्षण हे 100 टक्के अनुदानित शाळेमध्ये जसे मिळते तसे मिळणे , शेवटच्या वर्गातील पटसंख्या ग्राह्य धरून चालणार नाही ही अट शिथिल करणे, शाळेत दरवर्षी पटसंख्या असते पण एखाद्या वर्षी विद्यार्थी कमी झाली तर ती शाळा अपात्र करणे योग्य नाही.
तसेच पुणे व अन्य जिल्ह्यामध्ये आवक- जावक नोंदी व शालार्थ आय डी बाबत अनेक अधिकारी टाळाटाळ करत असून शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम अधिकारी करत आहेत. जे मुद्दे सांगितले आहेत त्यांची पूर्तता केली असली तरी मुद्दाम काही अधिकारी यांनी लोकांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे.
मुख्याध्यापक पद संरक्षित असताना देखील त्या ठिकाणी शाळाच अपात्र केल्या आहेत,असे अनेक प्रकार सुरू असून याकडे आपण लक्ष द्यावे ही विनंती यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रश्न शांतपणे ऐकून घेतले व याबाबत लवकरच शिक्षणमंत्री यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्याबाबत सुचना दिल्या व हे सर्व प्रश्न लवकरच सोडवू असा संघटनेस शब्द दिला.
जे अधिकारी शिक्षकांना नाहक त्रास देत असतील व जाणीवपूर्वक काही बाबी करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले. याबाबत शिक्षणमंत्री महोदय यांच्या बरोबर चर्चा करून लवकरात लवकर बैठक लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले.
मुख्यमंत्री भेटीवेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे ,आमदार कपिल पाटील, संघटनेचे पदाधिकारी संजय डावरे,सोलापूरचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे, भानुदास गाडे, सावंता माळी, संभाजी आडुरकर,हे विधानभवनात उपस्थित होते
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा