महाराष्ट्र
भाव माझ्या अंतरीचे..!(पुष्प 35 वे ) युगप्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले
*भाव माझ्या अंतरीचे..! (पुष्प 35 वे*)
*युगप्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले*
स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करणारे महात्मा जोतिबा फुले हे केवळ एक समाज सुधारक, लेखक, एक विचारवंत नव्हते तर ते एक युगप्रवर्तक क्रांतीसूर्य, एक विचार आणि नवीन समाज निर्मितीचे सांस्कृतिक पुरुष होते. त्यांनी प्रस्थापित समाजव्यवस्था फक्त नाकारली नाही तर नवसमाज निर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. महात्मा फुले यांनी नवीन समतामूल समाजव्यवस्था निर्माण करण्याचे प्रारूप भारतीय समाजव्यवस्थेत समोर मांडले.
आज महिला प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना, प्रगती करताना देशाचे, संस्कृती चे नाव उज्ज्वल करताना दिसत आहे. यामागे जोतिबा फुले यांचे क्रांतिकारी विचार, चिंतनशीलता बौद्धिक कौशल्य, स्त्री विषयक कार्य, प्रेरणा आहे. जोतिबा फुले समाज निर्मितीच्या या परिवर्तनवादी लढाईमध्ये स्त्रियांना केवळ सामावून घेतले नाही तर त्यांना लढ्याचे शिलेदार बनवले त्यांना सक्षम बनविले शिक्षित केले.
ज्योतिबा फुले यांनी फक्त स्त्री विषयक नव्हे तर दुबळ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी मौलिक कार्य केले. त्यांच्या विचारांनी क्रांती घडवून आणली आणि हळूहळू ही समाजव्यवस्था बदलली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होय. ते जातीने क्षत्रिय माळी होते. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे असे होते. त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करीत असल्याने त्यांना पुढे फुले असे म्हणू लागले. ज्योतिबा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई आणि वडिलांचे नाव गोविंदराव होते. ज्योतिबा फुले एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्या वेळचे वातावरण विद्याभासास पोषक नव्हते तरीही गोविंदराव यांना वाटले आपल्या मुलाने शिक्षित व्हावे त्यामुळे त्यांनी ज्योतिबाला वयाच्या सातव्या वर्षी खाजगी शाळेत घातले नंतर काही दिवसांनी लोकांच्या निरक्षरतेने गोविंदरावांचा बुद्धीभ्रम केला. परिणामी ज्योतिबांना शाळेतून काढण्यात आले आणि वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह धनकवाडी च्या झगडे पाटील यांच्या लहानग्या सावित्रीशी झाला. ज्योतिबाच्या जीवनात ज्ञानाची ज्योत पेटवली गेली. ज्योतिबाचे बौद्धिक कौशल्य, तर्कनिष्ठता पाहून त्यांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बॅग मुंशी आणि लिजेट साहेबांनी जोतिबांचे शिक्षण पुन्हा चालू करावे असा आग्रह त्यांच्या वडिलांकडे धरला परिणामी ज्योतीबांनी इ.स.१८४१ मध्ये एका स्कॉटिश मिशनरी शाळेत जाण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी शिवाजी महाराज, वॉशिंग्टन यांची चरित्रे अभ्यासली ' राइट्स ऑफ मेन ' या थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा त्यांच्यावर परिणाम झाला.
शाळेत शिकत असताना सदाशिव गावडे या ब्राह्मण मित्राचा सहवास त्यांना लाभला परिणामी जोतीरावांच्या जीवनात एक महत्त्वाची घटना घडली परिणामी ज्योतीबांचे आयुष्य बदलले.
ज्योतिबा आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता ब्राह्मणांनी त्यांचा क्षुद्र म्हणून तिरस्कार केला. त्यांना अपमानित करण्यात आले आणि तेथूनच ज्योतिबाच्या मनात एक ज्योत पेटली. प्रस्थापित समाजव्यवस्थेने स्त्रियांना गुलाम करण्यासाठी आपल्या सोयीचे साहित्य निर्माण केले व त्याला धार्मिक दर्जा दिला यांनी ग्रंथाच्या माध्यमातून श्रमिक वर्गाला गुलाम बनविण्यात आले. ही मानसिक गुलामी नष्ट करण्यासाठी प्रस्थापित धर्मग्रंथांचा विवेकशिल आढावा घेतला आणि गुलामगिरी , ब्राह्मणांचे कसब ,शेतकऱ्यांचे आसूड हे ग्रंथ लिहिले. या ग्रंथांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले स्त्रियांच्या शोषणासाठी प्रस्थापित समाजव्यवस्था कशी कार्य करते याचे विवेचन केले आहे.
'शेतकऱ्यांचे आसूड' या ग्रंथात शेतकऱ्यांच्या , कष्टकऱ्यांची घरची स्थिती ही देवधर्माच्या भीतीपोटी कशी जाळली जाते किंवा तिचे कसे शोषण होते याविषयी विवेचन केले आहे.
'सार्वजनिक सत्यधर्म 'या ग्रंथात त्यांनी मनुष्य केंद्रीभूत असणारा विश्व मानवाच्या कल्याणार्थ व्यापक विचार व्यक्त केला.
' गुलामगिरी ' या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांची व अस्पृश्य वर्गांच्या गुलामगिरी साठी प्रस्थापित धर्मग्रंथ किती जबाबदार आहे याचे विवेचन केले आहे. ' महात्मा फुले आणि स्त्री शिक्षण ' महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली पण ती सुरू करण्यापूर्वी ख्रिश्चन मशिनरी मुलींना शिकवण्यासाठी काही प्रयत्न केले होते पण ते अपयशी झाले. यामागे सनातनी धर्माचा प्रभाव होता परंतु ज्योतीबांनी या सर्वांना विरोध देऊन त्यांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीला आधी शिक्षित केले आणि त्यांना शिक्षिका म्हणून त्या शाळेत मुलींना शिकविण्याचे कार्य सोपविले. या शाळेत सुरुवातीला सात ते आठ मुली येत असे परंतु तेही मोठ्या साहसाने आणि धैर्याने एवढ्यात ही महात्मा फुले यांनी हार मानली नाही. स्त्री शिक्षणाचे कार्य चालू ठेवले त्यांनी आपल्या जीवनात एकूण १६ शाळा पुण्यात सुरू केल्या होत्या काही नंतर बंद पडल्या. मुद्दा महत्त्वाचा हा नाही की किती शाळा सुरू केल्या? त्या किती वर्षे कार्यरत होत्या? मुख्य मुद्दा हा आहे की त्यामागे ज्योतिबांची भूमिका काय होती.
मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी लोकांची शिवीगाळ सहन केली, दगडांचा वर्षाव सहन केला लोक त्यांच्या अंगावर शेण टाकत असे परंतु त्याविषयी ते सांगे हे तर मी करीत असलेल्या कार्याबद्दल लोक मला आदर देत आहे. माझ्यावर फुलांचा वर्षाव करीत आहे. अनेक अडचणींना अडथळ्यांना खाच खळग्यांना तोंड देऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकविण्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवले आणि त्याचे फळ आज आपण बघत आहोत की मुली ही कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही. प्रत्येक क्षेत्रात मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आपल्या कार्याने आपल्या कर्तुत्वाने.!
सतीप्रथा बालविवाह पद्धती, केशव पद्धती या क्रूर रुढी प्रथा विरुद्ध लढा दिला. देवदासी या प्राचीन आणि क्रूर प्रथेविरुद्ध आवाज उठविला. देवदासी ही एक अत्यंत प्राचीन क्रूर प्रथा होय. या प्रथेप्रमाणे समाजातील काही स्त्रियांची लग्न देवा सोबत लावून दिले जात असे. देवा सोबत लग्न लावून दिल्यानंतर त्या स्त्रीला आजन्म आजूबाजूला राहून देवाची देवळाची स्वच्छता ठेवण्याचे कार्य करावे लागत असे, त्यांना जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी देवळाशी संबंधित असणारे धनिक वर्ग पुरवित असे. यातूनच हा धनिक वर्ग देवदासींचे शारीरिक व मानसिक शोषण करीत. देवळाचा हा प्रकार बघून ज्योतिबा अतिशय दुःखी झाले व त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यामुळे मुंबई प्रांतात मोठी खळबळ निर्माण झाली होती.
ज्योतिराव बनले - " महात्मा ज्योतिबा फुले "! " हिंदू समाजातील बहुजन समाजाला स्व जागृत व आत्मनिर्भर करायला लावणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले होय " त्यांच्या कार्याचा मुंबई येथे गौरव करून त्यांना " महात्मा " ही उपाधी बहाल करण्यात आली.
प्रा. अभिजीत भंडारे
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा