संकटमोचक भाऊंची माणुसकी... गजाननराव मानकर यांची विचारपूस करताच भावुक क्षण
नांदुरा – मोठी माणसं ही केवळ पदांनी किंवा शक्तीने मोठी नसतात, तर ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि माणुसकीने मोठी असतात! याचा प्रत्यय नुकताच नांदुरा येथे आला, जेव्हा महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी अचानक गाडी थांबवून एका नागरिकाची विचारपूस केली.
घटना अशी घडली की, श्री. गजाननराव मानकर हे गावातून जात असताना अचानक त्यांच्या शेजारी एक गाडी येऊन थांबली. गाडीतून कोणीतरी त्यांना आवाज दिला. त्यांनी वळून पाहिले, आणि त्यांना क्षणभर विश्वासच बसला नाही – कारण गाडीमधून हाक मारणारे दुसरे तिसरे कोणी नव्हे, तर स्वतः गिरीशभाऊ महाजन होते!
गजाननराव मानकर यांचे काही दिवसांपूर्वी लिव्हर ट्रान्सप्लांटचे मोठे ऑपरेशन झाले होते. या काळात ते गिरीशभाऊंना भेटले होते. तेवढी एकच भेट भाऊंसाठी कायमचं नातं जुळवण्यासाठी पुरेशी ठरली. त्यामुळेच, जेव्हा रस्त्यावरून जात असताना भाऊंना गजाननराव मानकर दिसले, तेव्हा त्यांनी आवर्जून गाडी थांबवली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
ही घटना म्हणजे गिरीशभाऊ महाजन यांच्या संवेदनशीलतेचे आणि जनसामान्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचे जिवंत उदाहरण आहे. केवळ राजकारण नव्हे, तर समाजकारण आणि माणुसकी जपणाऱ्या भाऊंच्या या कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा