शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बसच्या धडकेत एस.टी. कंडक्टर ईश्वर कंडागळे यांचा मृत्यू – गावात शोककळा
जामनेर (२५ ऑगस्ट):जे रोज प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते… त्यांचेच जीवन बसच्या चाकाखाली संपले अशा शब्दांत आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण कंडागळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागळे (वय 33) हे एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर कंडागळे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस.टी. बस (क्र. MH 20 BL 3360) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले.विडंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली, त्यांचाच जीव अखेर एस.टी. बसच्या धडकेत गेला. या घटनेने सहकारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तात्काळ मदत केली. ईश्वर कंडागळे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गाव शोकसागरात बुडाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती मिळाली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा