महाराष्ट्र
उजनी पाणी प्रश्नी पालकमंत्र्याच्या निषेधार्थ धरणात जलसमाधी घेऊ; उजनी पाणी बचाव समितीचा इशारा
कुर्डूवाडी प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व करणारे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी चाेरुन इंदापूरला पळवले आहे. याचा निषेध म्हनून १ मे महाराष्ट्र दिनी सोलापूर येथे त्यांनी झेंडा फडकवू नये. अन्यथा पाणी चाेरीचा निषेध म्हनून उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे सदस्य उजनी धरणामध्ये जल समाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी ५ टीएमसी पाण्याची योजना मंजूर केली आहे. पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इंदापूरला पळवनार असल्याने याला विरोध करण्यासाठी कुर्डू ता. माढा येथे अतुल खुपसे पाटील यांच्या निमंत्रणा वरून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उजनी पाणी बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून या संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली भविष्यात दीर्घकालीन लढा लढण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले.
यावेळी प्रभाकर देशमुख यांनी मागणी केली कि, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणा वरील अनेक पाणी पुरवठा योजना निधी अभावी रखडलेल्या आहेत. उजनी धरणातील पाण्याचे १०० टक्के वाटप पूर्ण झालेले असताना व धरणात पाणी शिल्लक नसताना सुद्धा इंदापूरला पालकमंत्री भरणे यांनी पाणी चोरून नेले आहे. यामुळे भविष्यात जिल्हा वासियांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रही निम्मे कमी होऊ शकते. या विरुध्द जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार व आमदारांनी या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या पाणी प्रश्नासाठी मी मुंबईत उपोषण केले. यावेळी ५३० कोटी रुपये सरकारने मंजूर केले ते पैसे कुठे गेले हा अजित पवार यांना माझा सवाल आहे. जिल्ह्यातील अशा अनेक योजना पवार कुटुंबीयांनी निधी अभावी रखडवून ठेवून पाणी इंदापूर व बारामती येथे पळवले आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व पालकमंत्री म्हणुन करण्यास त्यांना आता कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही. यामुळे त्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी सोलापूर येथे शासकीय झेंडा फडकवू नये. जर त्यांनी झेंडा फडकला तर याचा निषेध म्हणून आम्ही उजनी धरणामध्ये जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिला.
या बैठकीचे निमंत्रक अतुल खूपसे पाटील म्हणाले की, वीस वर्षांपूर्वी शरद पवार यांनी या ५ टीएमसी उचल पाण्याच्या योजनेचे भूमिपूजन केले होते. याचा शासकीय आदेश त्यांनी आता काढलेला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आडून आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी बारामतीच्या ताई व दादा यांनी पळवल आहे. यामुळे बारामतीकरांची साखर कारखानदारी चांगलीच वाढनार आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यातील ऊस बागायतदार व सामान्य शेतकरी मात्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सोलापूर सह जिल्ह्यातील अनेक शहरातील पाणी पुरवठा योजनांना पाणी टंचाई जाणवून शहर वासियांना पाणी मिळनार नाही. हे आंदोलन कुणा एकट्या दुकट्याचे नाही तर सर्व जिल्हावासियांनी हे आंदोलन हाती घ्यावे. जोपर्यंत मुख्यमंत्री हा आदेश रद्द करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष पंढरपूरचे अभिजीत पाटील यांनी इशारा दिला की, उजनी धरण आता गाळानेच भरत आलेले आहे. कागदाेपत्री जाे पाणी साठा दाखवला जाताे ताे सत्यात अत्यंत कमी आहे. यात इंदापूर तालुक्यात नवीन याेजनेस पाणी गेल्यास जिल्हा वासियांची एक पाण्याची पाळी कमी हाेनार आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी, उद्योग, पिण्याच्या पाण्याच्या योजना सर्व संकटात सापडणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळीनी मतभेद विसरून एकत्र येऊन या निर्णया विरुद्ध लढा दिला पाहिजे. हा निर्णय रद्द झाला नाही तर भविष्यात या निर्णया विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा अभिजीत पाटील यांनी दिला.
दादा मामाच्या नेतृत्वा खाली लढा उभारु
सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे ५ टीएमसी पाणी इंदापूरला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळवून नेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्योग व शहर वासीयांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भविष्यात भासणार आहे. या निर्णया विरुद्ध आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे यांनी या लढ्याचे नेतृत्व करावे त्यांच्या नेतृत्वा खाली आम्ही सर्व जण सामील हाेवू. जिल्ह्याचे नेते होण्याची त्यांना संधी आली आहे ही संधी त्यांनी गमावू नये.
अतुल (भाऊ) खूपसे पाटील
बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हाळवणकर यांनी आराेप केला कि, उजनी धरणातील सांडपाणी या गोंडस नावा खाली पालकमंत्री यांनी उजनीचे पाणी पळवले आहे. धरणातून सांडपाणी वाहतच नाही ही वस्तुस्थिती आहे. पालकमंत्री जे खोटे बोलत आहेत याची पोल-खोल करून त्यांना राजकीय संन्यास घेण्यास आम्ही भाग पाडू. इंदापूरला जर पाणी गेले तर पंढरपूर तालुक्याचे फार मोठे नुकसान होणार आहे. ही योजना रद्द झाली नाही तर भविष्यात पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर जिल्हाबंदी करणार असल्याचा इशारा हाळवणकर यांनी दिला.
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष श्रीकांत नलवडे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, कार्याध्यक्ष अण्णासाहेब जाधव, प्रशांत करळे, कुर्डू चे सौदागर चाेपडे, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अॅड. बापूसाहेब मेटकरी, धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता व्यवहारे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, संदीप खारे, नाभिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीर गाडेकर, कुर्डू ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडीचे जमीर सैय्यद व अनेक शेतकरी उपस्थीत हाेते.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा