स्पर्धक क्रमांक ८३ हर्षदा संदीप मताडे कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ८३ हर्षदा संदीप मताडे कोल्हापूर

|| राजा शिवछत्रपती ||

      परवा 6 जुन 2021 दिवशी वर्तमानपत्रात बातमी वाचली. *यंदा शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा होणार*

       खरेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी "साधेपणा" हा शब्द कुठे तरी मनाला खटकला.. 
        पण नाईलाज होता. कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेला हा निर्णय योग्य च होता. कारण अखंड हिंदवी स्वराज्याची स्थापना आपल्या शिवाजी महाराजांनी किती मेहनतीने केली आहे हे आपणास माहित आहेच. आणि या स्वराज्यातील माणसे या कोरोनाने धारातीर्थ पडावी हे खुद्द महाराजांनाही आवडले नसते. कारण युद्ध जर अशक्य असेल तर तह करायची, दोन पावले मागे यायची कल्पना आपल्याला शिवाजी महाराजांनीच दिली आहे 

       क्षणात शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास डोळ्यासमोर आला.. 

      शिवाजी राज्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. पूजनीय जिजाबाई च्या पोटी जन्माला आलेल्या या बाळाची कुंडली काही वेगळीच होती.

       शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी ठेवले 

       वडील शहाजी राजे आदिलशहा च्या दरबारी सरदार होते. तो काळ खूप धामधुमीचा होता म्हणून शहाजी राज्यांनी जिजाबाई ना सुरक्षित अशा शिवनेरी किल्यावर ठेवले होते. 

       वडिलांच्या अनुपस्थितीत सुद्धा आई जिजाबाई नि बाळ शिवबा चे पालनपोषण खूपच चांगल्या पद्धतीने केले. रामायण, महाभारत, अशा धार्मिक कथा बरोबरच त्यांना शस्त्र विद्या सुद्धा  शिकवली. आदरणीय गुरुदेव दादोबा कोंडदेव हे त्यांचे गुरु.

        महाराष्ट्रात मोघलांची  चाललेली जुलमी राजवट, अन्याय याची कल्पना हि शिवबाला याच बाल वयात झाली. त्याच वेळी हळू हळू शिवबाच्या मनात याची चीड निर्माण होऊ लागली व त्यांच्या बालमनावर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य स्थापनेचा मनसुबा निर्माण झाला.

       गडावरील व आजूबाजूच्या गोरगरीब मुलांमध्ये खेळता खेळता, त्यांची चटणी भाकरी खाता खाता त्यांनी बाल मावळ्यांची सेनाच तयार केली. ते सर्व बाल मावळे गनिमी काव्यात पारंगत होते. डोंगर दर्यात.. जंगलात अगदी सहजपणे वावरत होते.

        आणि एक दिवस त्या बाल  शिवबाने आपल्या मूठभर बाल मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात शंभू महादेवाच्या साक्षिने करंगळी कापून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

          थोड्याच दिवसात आई जिजाऊ  साहेबांच्या आशीर्वादाने व गुरु दादोजी च्या मार्गदर्शनाने तोरणा किल्या जिंकून अवघ्या 14 व्या वर्षी स्वराज्याचे तोरण लावले.

       हळू हळू मावळे जमत गेले. तानाजी, संताजी, येसाजी, जिवा महाला, शिवा काशीद, कोंडोजी,बाजी असे अनेक मात्तबर मावळे निर्माण झाले जे शिवबा साठी व स्वराज्यासाठी शीर तळहातावर घेऊन लढत होते. 

         शिवबा किल्ले जिंकू लागले व स्वराज्याची व्याप्ती वाढू लागली. इकडे निजाम, आदिलशहा, कुतुबशहा यांच्या तोंडचे पाणी पळाले. 

          याच बरोबर शिवरायांनी रयतेत  सुधा स्वराज्य बद्धल आदर व निर्भयता निर्माण केली. यासाठी  वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शिवरायांनी जुलमी पाटलाचे हात कापून जनतेला स्वराज्यात सर्व जनतेत अभय निर्माण केले.

       सिद्धी जोहर,  अफजल खान,  शाहिस्तेखान, औरंगजेब असे किती तरी मातब्बराना  महाराजांनी धूळ चारली,  मारले. अक्षरशः कापले. 

       आणखी एक गोष्ट प्रकर्षाने लिहावी असे वाटते ते म्हणजे. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून  भविष्यात सागरी मार्गाने परकीयांचा धोका स्वराज्याला होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असे सागरी किल्ले बांधले. फक्त भूतलावरच नव्हे तर सागरावर सुद्धा स्वराज्याचा भगवा फडकवला.

        सिंहगड, प्रतापगड,  पन्हाळगड. अशा कित्येक किल्ल्या वरील महाप्रताप आपणास माहित आहेत. पण याच बरोबर स्वराज्यातील स्त्रियांना सुद्धा तितकाच आदर होता.  याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण लुटी मधील खजिन्या बरोबरच  आपल्या सरदारांनी कल्याणच्या सुभेदाराची सुंदर अशी सुन रायगडावर राज्यांच्या समोर उभी केली असता. आपले शिवाजी राजे काय म्हणाले आमच्या माँ साहेब जर अशाच सुंदर असत्या तर आम्ही हि असेच सुंदर झालो असतो. इतका आदर परस्रीला देणारा राजा.. परस्त्री ला मातेसमान मानणारा राजा या भूतलावर झाला नाही. होणार हि नाही. इतकेच नव्हे तर अफझल खानाच्या वधा नंतर त्याच्या चौसष्ट बायकांना योग्य सम्मानाने दिल्ली ला पाठवले व अफजल खानाची कबर प्रतापगडावर आदराने बांधली.. 

      असा हा आमचा मराठ्यांचा, महाराष्ट्राचा, भारताचाच नव्हे तर जगाचा राजा म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. अवघ्या जगाचा आदर्श. किती तरी गर्विष्ठ माना आमच्या या राज्यांसमोर झुकल्या, वाकल्या. 

        छत्रपती संभाजी राजे सारखा छावा या सिंहाने महाराष्ट्राला दिला.

         हिंदवी स्वराज्यासाठी स्वाभिमानाने जगावे कसे हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले तर  हिंदवी स्वराज्यासाठी स्वाभिमानाने मरावे कसे हे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले 

        अशा या महाप्रतापी  शिवरुद्रावताराचा स्वर्गवास 3 एप्रिल1680 या दिवशी झाला.

          छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. लिहिताना हात थांबत नाहीत. बोटांमध्ये एक वेगळीच शक्ती निर्माण होते. फक्त लढतानाच नव्हे तर लिहिताना सुद्धा अंगात एक स्फुरण चढते. रक्त सळसळून येते. 

       शेवटी इतकेच लिहितो 

       शिवरायांचे आठवावे रूप
       शिवरायांचा आठवावा प्रताप
       शिवरायांचा आठवावा साक्षेप
                या भूमंडळी


जय शिवराय..... जय महाराष्ट्र
Previous article
Next article

3 Comments to

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads