Blog
स्पर्धक क्रमांक २७ वैष्णवी अजित सुतार कोल्हापूर
' राजा शिवछत्रपती '
राजे असंख्य झाले आजवर या जगती;
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होते.यांचा जन्म '१९ फेब्रुवारी १६३०' रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले तर वडिलांचे नाव शहाजी भोसले होते. शिवरायांचे बालपण खूप धामधुमीत गेले. त्यांनी वयाच्या अवघ्या १२ वर्षांपर्यंत आई जिजाऊच्या देखरेखीखाली व शहाजीराजांनी नेमलेल्या नामवंत शिक्षकांकडून अनेक कला,विद्या,भाषा अवगत केल्या.
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा राजा
आजही गौरव गीते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त राजा
शिवछत्रपती
शिवबाराजांनी लहान वयातच स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी, दिव्य स्वप्न पाहिले.त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. स्वराज निमिर्तीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले; पण ते किंचित पण डगमगले नाहीत. त्यांनी स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराज हे अष्टपैलू, सर्वगुणसंपन्न युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय,अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले. सर्वधर्मसमभाव,स्त्रियांसाठी आदरभाव या न्यायाने ते वागले. स्वराज्य निर्माण झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूंचा सुळसुळाट होता. आपल्या धुरंदर आणि दूरदृष्टीने त्यांनी स्वराज्याच्या शत्रूंचा बीमोड केला.
अफजलखानाशी केलेले युद्ध,शायस्तेखानावर छापा, सुरतेची लूट, औरंगजेबाच्या दरबारात केलेला बिनधास्त प्रवेश , विशालगडावरचा चकवा, मोगल साम्राज्यातून सहिसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टींवरून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्त्व आपणास दिसून येते.
सिंहाची चाल,गरुडाची नजर
स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन
असेच असावे , मावळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवरायांची शिकवण
शिवाजीराजे सर्वगुणसंपन्न होते;पण त्यांनी दुसऱ्या धर्माचाही आदर केला. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व धर्माचे सैनिक होते. शिवरायांचे शौर्य राजधर्मापालन,कल्पकता, संघटन कौशल्य इत्यादी गुणांनी पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले.
असे आदर्श राजे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार,त्यांचे साहस ,त्यांचे कार्य, त्यांचा त्याग आजही आपल्याला नवप्रेरणा , जोम देतो. असा कर्तृत्ववान व पराक्रमी राजाविषयी व्यक्त होताना माझा निबंध ही कमीच पडतो. असा हा पराक्रमी राजा ३ एप्रिल १६८० रोजी कैलासवासी झाला.
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा हा राजा शिवछत्रपती
जय भवानी जय शिवाजी
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा