महाराष्ट्र
कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन केवळ २ दिवसांचे
राकेश कोळी उपसंपादक :-
कोरोनाची सध्याची स्थिती पाहता व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईत होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसाचे होणार आहे. 5 आणि 6 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन पार पडेल. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. बैठकीत पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजासंदर्भातील चर्चा करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले पाहिजेत. तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी विधानभवन, मुंबई येथे शनिवार व रविवारी 3 व 4 जुलै, 2021 रोजी RT-PCR कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात येणार असून गर्दी होऊ नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश करण्यास मनाई आहे. याचबरोबर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांनादेखील मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येणार असून प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्येदेखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहे.
शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध समाजबांधव यांचे अनेक प्रश्न आज ऐरणीवर असताना, मराठा तसेच ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? तीन पक्षांच्या राजकारणासाठी जनतेचा आणि लोकशाहीचा बळी देणे, हे अतिशय दुर्दैवी असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा