दैनिक शिवस्वराज्य विशेष लेख : एकाच स्थानकावर अनेक भावनांची स्थानके - दैनिक शिवस्वराज्य

दैनिक शिवस्वराज्य विशेष लेख : एकाच स्थानकावर अनेक भावनांची स्थानके



               गणेशचतुर्थीसाठी मिळालेली शाळेची सुट्टी संपली.गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात आलेले पाहुणे मुंबईला जाण्यासाठी निघाले.रविवारचा दिवस होता. शाळेलाही सुट्टी होती.आणि माझ्या वाट्याची घरातली सगळी कामेही मी आवरली होती.त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी मी सुद्धा बाबांसोबत रेल्वस्थानकावर गेले.
            रेल्वेस्थानकावर पोहोचताच प्रचंड गर्दी पाहून सगळ्यांच्या कपाळावर आठया पडल्या.त्या गर्दीतून "जरा बाजूला व्हा" अस करून करून वाट काढत एकदाचे फलाट क्रमांक ३ वर आम्ही पोहोचलो.आणि सुटकेचा निःश्वास सोडला.ठिकठिकाणी माणसे आणि त्यांची सामाने स्थिरावलेली दिसत होती.एखादा खेळ खेळताना समूह करण्यासाठी एकत्र यावे तसे कुटुंबांचे समूह गाडीची वाट पाहत उभे होते.
             रेल्वेस्थानकावर बरीच वेगवेगळी दुकाने होती.परंतु "हिप्पो वडापाव"असा मोठा बोर्ड लावलेले दुकान चारही बाजूंनी खवय्यांनी घेरले होते.वडापावची दमदार विक्री होत असल्याचे समाधान ते दुकान चालवणाऱ्या कोकणी जोडप्याच्या चेहऱ्यावर उमटले होते.तर दुसऱ्या बाजूला छत्री घरी विसरलेले विश्राळू लोक धो धो पडणाऱ्या पावसामुळे निपचित उभे राहून पाऊस कधी थांबेल आणि कधी इथून पटकन निसटता येईल याची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते.
              समोरच्या फलाटावर,काही दिवस राहायला आलेल्या मुलीला निरोप देण्यासाठी आलेल्या आईला आता काही मिनिटात आपली मुलगी डोळ्यासमोरून दूर निघून जाईल हा विरहच सहन होत नव्हता.आणि म्हणूनच साडीचा पदर डोळ्यांना लाऊन धरत ओसांडू पाहणाऱ्या अश्रूंना ती पदरात साचवत होती.नेहमीच प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला येतो,हे ऐकल होत,पाहिलं सुद्धा होत.पण एक प्रेयसी खूप दूरवरून आपल्या प्रियकराला भेटायला आली होती.दोघेही पायऱ्यांवर उभे राहून अगदी नॉनस्टॉप बोलत होते.खूप महिन्यांनंतर झालेल्या भेटीचा निखळ आनंद त्यांच्या अंतरंगात खुललेला जाणवत होता.
             कोणाचीही पर्वा न करता मनसोक्त कोसळणाऱ्या पावसाच्या इच्छेमुळे ९.०० ची वेळ असलेली गाडी अर्धा तास उशिरा येईल अशी घोषणा झाली आणि लोकांची चिडचिड वाढली.तिथे असलेली छोटी छोटी गोंडस मुले मात्र एकमेकांची अजिबात ओळख नसताना निरागसपणे एकमेकांसोबत येईल तो खेळ खेळू लागली होती.पालकांची मात्र करडी नजर काळजीपोटी त्यांच्या मुलांवर खिळून होती.
             दहा मिनिटात रेल्वे येण्याची घोषणा झाली.गडबडीने सगळे सामान घेतल्याची खात्री करत प्रवासी पुढच्या प्रवासाला सज्ज झाले.रेल्वे फलाटावर येऊन थांबताच रेल्वेत प्रवेश करून आपली जागा शोधत प्रवाश्यांनी काही तासांसाठीचा आपला संसार तिथे मांडला.रेल्वे सुटण्याची शिट्टी वाजली नातेवाईक निरोप देत आपल्या घरी परतले.मी आणि बाबा आम्ही दोघेही पाहुण्यांना निरोप देऊन घरी आलो.पण ते स्थानक मात्र फक्त रेल्वेचे नाही तर मनुष्याच्या अनेक भावनांचे स्थानक बनले होते. एकाच स्थानकावर काळजी प्रेम विरह,आनंद,समाधान,दुःख,
चिडचिड,निरागसता या विविध भावनांचे दृश्य साकारले होते.
         पुन्हा कधी रेल्वस्थानकावर जाण्याचा योग येईल हे माहीत नव्हते.परंतु मनुष्याच्या अनेक भावनांनी व्यापली गेलेली आजची तिथली जागा ही वारंवार अश्याच भावनांनी व्यापली जाणार आहे याची खात्री पटली.भावना त्याच असतील,पण त्या भावना अनुभवणाऱ्या व्यक्ती बदलत राहतील.                                                                                                    

     लेखन - मृणाली विष्णू पिळणकर.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads