यश मिळवताना दिरंगाई नको - दैनिक शिवस्वराज्य

यश मिळवताना दिरंगाई नको


प्रशांत आडसर प्रतिनिधी बदलापूर :-

             प्रत्येक मनुष्याचे जीवन आणि वेळ यांचा खूप निकटचा संबंध आहे.कारण जीवनात आपण वेळेला महत्त्व दिले तर वेळ आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी मिळवून देते.एखादी गोष्ट मिळवताना बऱ्याच वेळा अडचणीचे, अडथळ्याचे प्रसंग येतात ज्याला आपण सामोरे जातो.परंतु काही वेळा काही अडथळे आपणच निर्माण करतो,ज्यामुळे आपण यशापासून दूर लोटले जातो.त्यापैकी एक अडथळा म्हणजे दिरंगाई.आपल्याला जर आपल्या कामात लवकर यशस्वी व्हायचे असेल तर दिरंगाई टाळली पाहिजे. 
             मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की आयुष्य हे क्षणभंगुर आहे.अगदी पुढच्या क्षणी काय होईल याचाही अंदाज आपण बांधू शकत नाही.म्हणून एकेक क्षण समजून घेऊन वर्तमान कसा सार्थकी लावता येईल,यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.आपण भविष्याची तयारी म्हणजे काय करतो? तर उज्ज्वल भवितव्यासाठी वर्तमानात दिरंगाई न करता प्रत्येक क्षणाचा वापर करतो.म्हणूनच वर्तमानात आपल्या चिमटीतून गोष्टी निसटून जाऊ नयेत म्हणून आपण दक्ष राहिले पाहिजे.
             "कल करे सो आज,आज करे सो अब",हे संत कबीर यांचे दोहे आपल्याला आठवतच असतील.ज्यामधे दिरंगाई टाळून काम करण्याचे महत्त्व आपल्याला कळते.बऱ्याच जणांना आजचे काम उद्यावर ढकलण्याची सवय असते.ज्यामुळे नकारात्मकता वाढीस लागते आणि मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आळस हा माणसाला चिकटू लागतो. परिणामी आपल्या कामाचा डोंगर वाढून आपल्यावर ताण निर्माण होतो.
            कामाचे चक्र हे ठरलेले असते. आजचे काम जर आपण उद्यावर नेले तर उद्याचे काम कधी करणार?शाळेमध्ये जर आपण एका दिवसाचा अभ्यास चुकवला तर दुसऱ्या दिवशी दोन दिवसांचा मिळून अभ्यास करावा लागतो.एवढा सगळा अभ्यास करायचा कसा या विचाराने आपण ओढूनताणून कसाबसा तो अभ्यास पूर्ण करतो.पण यामधून आपल्याला काय मिळते याचा विचार आपण कधी केला आहे का? एका छोट्या दिरंगाईमुळे त्या दोन दिवसात आपण काहीच साध्य केलेले नसते.म्हणूनच कितीही मोह होत असला तरी आपले काम वेळेवर करण्याचे आपण सोडायचे नाही.
             मित्रांनो,गेलेली वेळ आयुष्यात पुन्हा कधीच येत नाही.त्यामुळे "उद्याचा काय भरवसा",या एका वास्तवतेवर आपण वर्तमानात जगण्याचा आनंद लुटत असतो.त्वरित काम करण्याची सवय आपण स्वतःला लावली पाहिजे.कारण ही सवय आपल्याला काम पूर्ण झाल्याचा आनंद आणि अनुभवही देते.तुम्हीच बघा ना,वेळ काढणाऱ्याला कोणी काम देत का?आपणही त्याच शिंपिकडे आपले कपडे शिवायला देतो जो दिरंगाई न करता वेळेत आपल्याला सुंदर कपडे शिवून देतो.कारण आजच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात जो दिरंगाई टाळतो
तोच प्रगतीच्या दिशेने पुढे पळतो.
               काम वेळेवर न केल्याने इतरांच्या नजरेत आपण आपल्याबद्दलचा विश्वास गमावून बसतो.इतरांच्या बरोबरीने काम करणारे आपण आपल्या दिरंगाईमुळे या अनेकांच्या रांगेतून बाहेर ढकलले जातो.अमूल्य वेळेच्या अपव्ययामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संधीना आपण येण्याआधीच मागे पाठवतो.इतके सगळे तोटे आपल्याला आपल्या दिरंगाईमुळे सहन करावे लागतात.म्हणूनच त्वरित काम करण्याची सवय आपल्यासाठी फायदेशीर आहे.
             खूप मोठ्या,आकर्षक अश्या संकल्पनाच केल्या पाहिजेत अस नाही.छोट्या,सोप्या गोष्टी पूर्ण करण्याच्या दिशेने चालूया.आपल्याला काही जग जिंकायचे नाही आहे.आज जेवढं ठरवलंय तेवढंच काम आज वेळेवर पूर्ण करा.त्याचा मनसोक्त आनंद घ्या आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवावर पुढे चला.

मृणाली विष्णू पिळणकर

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads