महाराष्ट्र
पंदेरी धरणातून गळती नागरिकांचे स्थलांतर सुरू, प्रशासनाला जाग
राकेश कोळी उपसंपादक :-
मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्ह्य़ातील तिवरे वासियांच्या जखमा ताज्या असतानाच हा प्रकार समोर आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
गेल्या २५ वर्षापासून अपुर्णावस्थेत असलेल्या मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली असून हे धरण फुटण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेवून प्रशासनाने आजूबाजूच्या गावातील व वाड्यातील लोकांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर या धरणाला लागलेली गळती रोखण्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच पाटबंधारे विभागाकडून युध्द पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. गळती रोखण्याचे काम सुरू जरी असले तरीही अद्याप पर्यंत धरणाला लागलेली गळती रोखण्यात प्रशासनाला यश आले नाही. प्रशासनाने संभाव्य धरण फुटीचा धोका लक्षात घेवून जिवंत हानी टाळण्यासाठी व तत्पर मदतकार्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आपात्कालीन स्थितीत मदतीसाठी खेड येथील रेस्क्यू टीम व मदत ग्रुपचे सदस्य घटनास्थळी दाखल झालेले आहेत. धरणाची गळती वाढल्यानंतर प्रशासन आता खडबडून जागे झाले असून स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरण हे गेल्या २५ वर्षापासून अपुर्णावस्थेत आहे. जिल्ह्य़ातील दुसर्या क्रमांकाचे मोठे धरण असून २५ वर्षानंतर आजही अपुर्णावस्थेत आहे. या धरणाच्या पाण्याचा वापर केवळ दोन गावांचा तहान भागविण्यासाठी करण्यात येतो. या धरणाचे बांधकाम व यातील पाण्याचे योग्य नियोजन केले असते तर येथील हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली असती. सन २०१० पर्यंत या धरणावर सुमारे ६.५ कोटी रूपये खर्ची टाकण्यात आले आहेत. तरी २५ वर्षे होऊन ही हे धरण अपुर्णावस्थेत आहे. केवळ प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हे धरण अपुर्ण राहिले आहे. तसेच २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सुमारे २ कोटी ५० लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. या पावसाळ्यापूर्वी धरणाच्या दुरूस्तीचे कामवर हे पैसे खर्च केल्याचे पुढे येत आहे. मात्र दुरूस्तीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्चून ही जर धरणाला गळती लागत आसेल तर, हे पैसे गेले कुठे असे आरोप स्थानिक पातळीवर ग्रामस्थ अस्लम लोडगे यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
धरणाची गळती लक्षात कशी आली?
पंदेरी स्थानिक ग्रामस्थ व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जमीन, मांजरेकर हे रविवारी सांयकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान पंदेरी लवंड नाला या पुलावरून येत असताना नदी पात्रातील पाणी हे गढूळ म्हणजेच लाल रंगाचे दिसून आले. एकतर मंडणगड पाऊस पडत असेल किंवा स्थानिक आदिवासी लोक मच्छीमारी करत असतील असा समज झाल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र रविवारी आदिवासी वाडीतील लोकांनी मुख्य बंधाऱ्याला भगदाड पडल्याची बाब निर्देशित नमस्कार आणून दिली. यावेळी आदिवासी वाडीत राहणारे व धरणाचे पहारेकरी संजय पवार यांना धरणाचा बंधारा खचत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिल्यानंतर सोमवारी रात्रीच कामाला सुरवात केली. मंगळवारी सकाळी मात्र प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंदेरी धरणाकडे धाव घेतली. मंगळवारी दिवसभर ही गळती रोखण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
२०१५ पासूनच धरणाच्या दुरूस्तीची मागणी
पंदेरी येथील धरणाच्या दुरूस्तीसाठी येथील ग्रामस्थ जमीर मांजरेकर व अस्लम लोडगे यांनी सन २०१५ मध्येच शासनाकडे पत्रव्यवहार करून या धरणाच्या दुरूस्तीची व डागडुजी मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीला जर प्रशासनाने गांभीर्याने घेतले असते तर कदाचित धरणाची गळती रोखता आली असती. पावसाळ्यापूर्वी या धरणाच्या सुरक्षेचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र असे असले तरीही पंदेरी धरणाला लागलेली गळती व संभाव्य धरण फुटाचा धोका नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे उद्भवला हा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमका धोका कुणाला?
संभाव्य धोका लक्षात घेवून प्रशासनाने या परिसरातील लोकांचे स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. यावेळी पंदेरी बौध्दवाडीतील रूग्णांना पंदेरी ग्रामीण रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. या धरणाच्या पायथ्याशी वसलेले पंदेरी गावातील खालचा भाग, पंदेरी मोहल्ला, आदिवासीवाडी, रोहिदास वाडी, सुतारवाडी, कोंडगाव हवेलीवाडी, पंदेरी व बहिरवली ग्रामपंचायतीत येणाऱ्या सुमारे १० ते १२ वाड्यांना धोका निर्माण झाला आहे. पंदेरी पंचक्रोशीतील २०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
धरणातील पाणी कमी करण्याचा प्रयत्न
पंदेरी धरणाला लागलेल्या गळतीमुळे धरणफुटीचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. यामुळे होणारी जिवंत हानी टाळण्यासाठी प्रशासनाने २०० लोकांचे स्थलांतर केले आहे. मात्र धरणातील पाण्याचा साठा बघता मोठ्या प्रमाणात वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ओव्हर फ्लो साठी असलेला बांध फोडून धरणातील पाणी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा