महाराष्ट्र
भाव माझ्या अंतरीचे..!( पुष्प ३३ वे)**लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने
वर्ग विग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेले सिद्धहस्त कादंबरीकार लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण भागातील रांगडा तमाशाला लोकनाट्य हे बिरुद त्यांनी दिले. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द. ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते.
अण्णाभाऊ साठे हे अंतर बाह्य मार्क्सवादी तसेच जातीच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्व होते. वैयक्तिक दुःखाचा विचार न करता, आपले विचार कार्य व प्रतिभा यांच्या सहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.
१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. हे गाव पूर्वी कुरुंदवाड संस्थानात होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दाम्पत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.
अण्णाभाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंताबाई. अण्णा प्रमाणेच आहे साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळवण्याच्या कामाला जात. त्यांच्या वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकाराम म्हणजेच अण्णाभाऊ वर होती. त्यांच्या वडिलांनी मुंबईत उच्चभ्रु आणि उच्चशिक्षित समाज पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातीतील मुलांसाठी त्याकाळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यामुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढी जात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पाना फुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडीमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे पोवाडे लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे. या छंदामुळे त्यांच्या भोवती नेहमीच मित्रमंडळी जमलेली असत.
वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई- वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबिबी चाळीत राहायला गेले. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले. एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसऱ्या म्हणजे मुक चित्रपट.
कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षांच्या सभांचे आयोजन करणे, वॉल पेंटिंग करणे, हॅन्ड बिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टीमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याचवेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिश वाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक ,डोअर कीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंग बॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्ड वरील अक्षरे जुळवीत ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिल मधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. यावेळी पुन्हा साठे कुटुंब वाटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे,सभा, सत्याग्रह,आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णाभाऊंना वाटेगाव मध्ये राहणे शक्य नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णाभाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल हे वाद्ये वाजवण्याची कला या गुणामुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. १३ कथासंग्रह,१४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे १२ उपहासात्मक लेख लिहिले.
बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब - दिल्लीचा पोवाडा अंमळनेरचे हुतात्मे काळ्या बाजाराचा पोवाडा," माझी मैना" हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ' एकजुटीचा नेता ' ते हिटलरच्या फॅसीझम विरोधात स्टँलीन ग्राड चा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांती वरील " चिनी जनांची मुक्ती सेना ," हे गौरव गान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले " जग बदल घालुनी घाव- सांगून गेले भीमराव " हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णाभाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यातून, पोवाड्यातून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चले जाव चळवळीच्या काळात वाटेगावात ही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी "लाल बावटा" या कलापथकाची स्थापना केली. यावेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या ,पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहरांचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंताच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.
मुंबई सरकारने "लाल बावटा" या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशांचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली. या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकीरा अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या.३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रह ही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॅलीन ग्राडचा पोवाडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे- अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत.
अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमिळ, मल्याळी या भारतीय भाषा बरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ, अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यासारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णावर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतिलही,राज कपूर, शंकर शैलेंद्र , बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णावर प्रेम होते. ओलेग सारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.
अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ' माटुंगा लेबर कॅम्प' या दलित शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्प मधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/ कार्यकर्ते आर बी मोरे, के एम साळवी, शंकर नारायण पगारे,यांच्यासोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्सवादी विचाराच्या अभ्यास वर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्प मधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख, व शाहीर द ना गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला.
अण्णाभाऊ सारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधूनच वार्ताहर, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या व विचारांशी संबंधितसह मोडकांच्या लोकसाहित्य प्रकाशनाने व वा. वि. भटांच्या अभिनय प्रकाशनानेच प्रथम अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, कथासंग्रह, नवे तमाशे आदी नाट्यसंग्रह प्रकाशित करून जनमानसात नेण्याचे भरीव काम केले आहे. अण्णा भाऊंच्या 'शाहीर' या पुस्तकास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला आहे. अण्णाभाऊंच्या 'इमानदार' नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यातही कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ' इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन'( इप्टा) या संस्थेचे सुप्रसिद्ध सिने अभिनेते कॉ बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला.व त्या नाटकात अभिनेते ए. के हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. नंतर अण्णाभाऊंना 'इप्टा'चे अखिल भारतीय अध्यक्षपदी मिळाले होते. जात भारतभरातील सुप्रसिद्ध लेखक कलावंत, विचारवंत त्यांच्यासोबत कार्यरत होते. अण्णाभाऊंच्या 'फकीरा' कादंबरीवरील चित्रपट निर्मितीसही 'इप्टा' च्या कलावंताचे मोलाचे सहकार्य लाभले. या हरहुन्नरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा.
*प्रा. अभिजीत भंडारे*
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा