राहुल चव्हाणांच्या आंदोलनाने जामनेर बसस्थानक दणाणले! समस्या मार्गी लावण्यासाठी ८ दिवसाचा अल्टिमेटम, नाहीतर ठिय्या मारण्याचा इशारा
जामनेर: शिवसेना (उबाठा) चे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी आज जामनेर बसस्थानकाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. त्यांनी आगार प्रमुखाला घेरून प्रश्नांची सरबत्ती केली. आगार प्रमुखांची बोलतीच बंद झाल्याचे यावेळी दिसले. बसस्थानकावर सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही, चोरीच्या घटना वाढल्यात, हिरकणी कक्ष नाही, स्वच्छता नाही, पोलीस बंदोबस्त नाही यासह विविध समस्या राहुल चव्हाण यांनी मांडल्या. ८ दिवसांच्या आत समस्या मार्गी लागल्या नाही तर इथे ठिय्या आंदोलनच करतो असा खणखणीत इशारा त्यांनी दिला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांनाही चांगलेच धारेवर धरले, तिकड बड्या बड्या बाता मारता अन् इकडे स्वतःच घर सांभाळता येत नाही असा टोला त्यांनी लगावला.
राहुल चव्हाण यांनी आगार व्यवस्थापकांच्या नावे निवेदन दिले असून त्यात समस्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. संपूर्ण बस स्थानकात तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, हिरकणी कक्ष आजच्या आज चालू करावा. बस स्थानकावरील महिला व पुरुष शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, वाहतुकीची शिस्त लागण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. बस स्थानकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पोलीस बंदोबस्त वाढवावा अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. ८ दिवसांत प्रश्न निकाली निघाला नाही तर ठिय्या आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला..यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख अड.प्रकाश पाटील,युवासेना शहर प्रमुख विशाल भोई,राहुल पाटील,प्रशांत सुरवाडे,उस्मान शेख,सईद शेख,किशन मोरे,पवन भोई,काशिनाथ शिंदे उपस्थित होते.
आगार प्रमुख म्हणून ठेकेदाराचे दुर्लक्ष..
दरम्यान यावेळी राहुल चव्हाण आणि आगार प्रमुख यांच्यात झालेल्या चर्चेत आगार प्रमुखांनी बस स्थानकाच्या दुरावस्थेसाठी ठेकेदार जबाबदार असल्याचे म्हटले. २०१८ मध्ये बस स्थानकाच्या कामासाठी १४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. ६ वर्षे उलटली तरी काम का पूर्णत्वास जात नाही, पैसे कुणाच्या घशात जातात असा आरोप चव्हाण यांनी केला.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा