मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, उपचारानंतर नाशिककडे रवाना
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना वरणगाव येथे शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांच्या पार्थिवाला मानवंदना देताना अपघात झाला. पार्थिवाच्या दर्शनासाठी मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये उंच उडी मारून चढत असताना ट्रकवरील लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला जोरात लागला. या धक्क्याने त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला आणि त्यांना क्षणभर चक्कर आली.घटनेनंतरही मंत्री महाजन क्षणभर थांबले नाहीत. त्यांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. मात्र, रक्तस्राव वाढल्याने उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी आणि शेख आखलाक यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा आग्रह धरला.वरणगावमधील डॉक्टर निलेश पाटील यांनी मंत्री महाजन यांच्यावर प्राथमिक उपचार केले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी ड्रेसिंग करण्यात आले तसेच आवश्यक इंजेक्शन आणि औषधे देण्यात आली. जबर मार बसल्यामुळे मंत्री महाजन यांना काही क्षण काहीच उमजत नव्हते आणि चक्कर आल्यासारखे वाटत होते. अशा अवस्थेतही मंत्री महाजन यांनी विश्रांती घेतली नाही. त्यांनी शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पत्नी व कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. “देशसेवेतील कर्तव्य बजावत अर्जुनला वीरमरण आले आहे, त्याचे दुःख आम्हालाही आहे. मी आणि राज्य सरकार त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले.यानंतर, ते थेट अंत्ययात्रेत सहभागी झाले. हजारो वरणगावकरांच्या उपस्थितीत तिरंगा सर्कल येथे त्यांनी मानवंदना दिली. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, मात्र मंत्री महाजन यांनी तो नाकारला.“महत्त्वाची बैठक असल्याने मला तातडीने नाशिकला जावे लागेल,” असे सांगून ते आपल्या वाहनाने नाशिककडे रवाना झाले. त्यांच्या या जिद्दीने आणि जबाबदारीच्या भावनेने उपस्थित सर्वांना प्रभावित केले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा