आपले रक्तदान – जीवनदान..पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनावर भुसावळमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला मानवतेचा संदेश!
भुसावळ | ९ मे २०२५
देशाच्या सीमारेषेवर जवान जीवाची बाजी लावत आहेत, तर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाशी झुंज देत आहेत. त्यांच्या मदतीसाठी रक्तदानाच्या माध्यमातून उभे राहण्याचे आवाहन पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांनी केले असून, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
आज विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ येथे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजय सावकारे यांच्या हस्ते या भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला.
जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श उभा केला. “हे रक्तदान फक्त सामाजिक कर्तव्य नाही, तर देशभक्तीची कृती आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी जिल्हावासीयांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला विभागीय रेल्वे व्यवस्थापक मा. श्रीमती इति पांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.के. चौधरी, रेल्वे सुरक्षा आयुक्त श्री. मनोज कुमार, रेल्वे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय निकम, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सीमेवरील जवानांनी दाखवलेले शौर्य हे अभिमानास्पद आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच खरी देशसेवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे देश आज सुरक्षित आहे.
रक्तसाठ्याचे नियोजन
५०% रक्तसाठा – सीमारेषेवरील जवानांसाठी
५०% रक्तसाठा – जिल्ह्यातील आपत्कालीन गरजूंना
१५ दिवसांचे विशेष रक्तदान महाशिबीर सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि शहरात हे शिबीर राबवले जाणार आहे.
आपले रक्तदान म्हणजे जीवनदान – देशसेवा आणि समाजसेवेचे प्रतीक
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा